शुक्रवार, २३ डिसेंबर, २०११

आजारांची वर्दी...त्रासदायक सर्दी

वातावरणातील सततच्या बदलांनी, सततच्या प्रवासाने तसेच अचानक आहार-विहारात घडलेल्या बदलांमुळे आपल्या आरोग्यावर पहिला हल्ला सर्दी करते. सर्दीचा त्रास सुरू झाला की आपोआपच डोकेदुखी तसेच कित्येकदा
खोकल्याचा त्रासही डोकं वर काढतो. मुळात सर्दी ही अनेक आजारांची जननी समजली जाते. त्याचप्रमाणे तापासारख्या अनेक आजारांची वर्दी म्हणजे पूर्वसूचनाही सर्दीच देते. सर्दीचा हा मुख्यत्वेकरून हिवाळ्यात उद्भवनारा आजार समजला जातो. थंडीत सकाळचा प्रवास, पावसात भिजणे, थंड पेय तसेच थंड पदार्थ जास्त खाणे या सवयी सर्दीला आमंत्रण ठरतात. मात्र हल्लीच्या धकाधकीच्या जीवनमानात आणि प्रदूषित वातावरणामुळे कोणत्याही ऋतूमध्ये सर्दीचा त्रास अनेकांची पाठ सोडत नाही.


आधी पातळ असलेली सर्दी उत्तरोत्तर घट्ट होत जाते. सर्दी पडशात बारीक ताप येण्याचीही शक्यता असते. नाक बंद होऊन लालसर होते, घसा खवखवतो तसेच घशात खाजल्यासारखे होते. सर्दी झाल्यावर वेळीच उपाययोजना न केल्यास थकवा जाणवतो आणि जास्त दिवस सर्दी तशीच राहिली तर अशक्तपणा वाढत जातो. नाकाच्या आतल्या भागाला सूज आल्यानं नाकातून कानाकडे पोहोचणाऱ्या कानाघ नलिकेचे तोंड बंद होण्याची शक्यता असते. कानाघ नलिकेचे तोंड ब्लॉक झाल्याने कानात विशिष्ट संवेदना होणेमुळात सर्दी-पडसे एका विशिष्ट जातीच्या विषाणूंमुळे होते. कधीकधी सर्दी संसर्गामुळेही होऊ शकते. सर्दी-पडशामध्ये नाकाच्या आतील त्वचेचा दाह होतो आणि कित्येकदा नाकाच्या आतील त्वचेला सूज येते. नाकातून पाणी वाहू लागते. सर्दी झाल्यावर पहिल्या दोन-तीन दिवसात नाकातले पाणी पांढरे तसेच पातळ स्वरुपाचे असते.
किंवा कानात गच्चपणा जाणवतो तसेच कानाचे दडेही बसतात.

संसर्गातून झालेली सर्दी दोन-तीन दिवसांत आपोआप बरी होते मात्र अशा सर्दीत थंड पदार्थ वर्ज्य करत खाण्यापिण्याच्या सवयीत प्राथमिक बदल करणे गरजेचं असतं. सर्दी झाल्यावर प्राथमिक उपाययोजना म्हणून भरपूर कोमठ पाणी प्यावं. तसेच दिवसातून दोन ते तीन वेळा गरम पाण्यात कोबी टाकून त्याची वाफ घ्यावी. गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात. त्याचप्रमाणे रात्री झोपताना कापूर ठेचून गरम पाण्यात टाकावा आणि त्याची वाफ घ्यावी. तसेच पूर्णपणे विश्रांती घ्यावी. थंड वातावरणापासून दूर राहावं. शक्यतो एसीत जाणं टाळावं. प्रवास करताना कान आणि शरीर झाकून घ्यावं. उबदार कपडे तसेच झोपताना उबदार रजई घ्यावी. घरातलं वातावरण उबदार ठेवावं. शिंकताना नाकापुढे रुमाल धरावा. म्हणजे इतरांना सर्दीची बाधा होणार नाही.

घट्ट झालेली सर्दी नाकपुड्यात साचून राहिल्याने नाक चोंदते आणि श्वसनाला त्रास होतो. नंतर डोकेदुखी सुरू होते. त्याचप्रमाणे घट्ट झालेली सर्दी जास्त काळ राहिल्यास छातीत कफ साचतो आणि खोकला डोकं वर काढतो. खोकला जास्त काळ राहिल्यास फुफुसाचे आजार बळावण्याचा धोका असतो. त्यामुळे खोकल्यावर त्वरीत इपचार
करणं क्रमप्राप्त ठरतं. कित्येकदा खोकल्याचं मूळ टीबीसारख्या आजारातही असतं. त्यामुळे खोकला जास्त काळ टिकल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घ्यावेत. धुम्रपान, तंबाखू, गुटखा तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थ पूर्णत: वर्ज्य करावेत. दही, तुप तसेच थंड पदार्थ खाणं टाळावं. आहार गरम असेल याची काळजी घ्यावी. विविध प्रकारचे सूप सर्दी आणि खोकल्यावर गूणकारी ठरतात. सर्दी आणि खोकल्यावर काही आयुर्वेदिक घरगुती उपायही करता येतात. मात्र घरगुती उपाय करूनही फरक पडला नाही तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावेत.

1) नियमित द्राक्षांचं सेवन केल्यानंही सर्दीवर काही प्रमाणात मात करता येते.
2) नेहमी सर्दी होत असणाऱ्या व्यक्तींनी क जीवनसत्व असणाऱ्या पदार्थांचं ( संत्री, टोमॅटो) सेवन वाढवावं.
3) एक चमचा मधात चिमूटभर पांढऱ्या मिरीचं चूर्ण टाकून नीट घोटून आठवडाभर दिवसातून चार ते पाचवेळा घ्यावं.
4) काळी मिरी पावडर आणि सुंठीचं मिश्रण मधातून दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावं.

5) सुंठ आणि काळी मिरी पावडर मधात मिसळून दिवसातून दोन ते तीन वेळा घेतल्यास खोकल्यापासून आराम मिळू शकतो
6) हिवाळ्यात दररोजच्या जेवणात लसणाच्या दोन ते तीन पाकळ्यांचा समावेश केल्यास खोकल्यापासून सुटका मिळू शकते
7) हा अगदी साधा आणि सोपा असा उपाय आहे.
8) मध आणि आवळा पावडर यांचे मिश्रण तसेच द्राक्षाचा रस आणि मध यांचे मिश्रणही फायदेशीर ठरते.
9) पाव चमचा मिरी पावडर, पाव चमचा सुंठ पावडर, एक चमचा मध हे सगळे दोन चमचे पाण्यात मिसळावे. खोकल्याची उबळ आल्यावर हे मिश्रण घेतल्यास लगेच आराम मिळतो.


डॉ. कीर्ती प्रवीण ढोबळे,
नवी मुंबई

रविवार, ११ डिसेंबर, २०११

अतिसार : कारणं आणि उपाय

|| गुदेन बहुद्रवसरण अतिसार: || पोटात गेलेल्या अन्नाचं पचन होऊन आणि अंतर्पोटातील विविध क्रिया होऊन अतिद्रव मलाचे अतिसरण म्हणजेच अतिसार किंवा हगवण होय. सुदृढ आणि निर्दोष निरोगी जीवनासाठी योग्य पोषणमूल्य असणारे अन्न पोटात जाणं जितकं गरजेचं असतं तसंच त्याचं निस:रण होणंही तितकच आवश्यक असतं. दिवसातून कितीवेळा अन्नग्रहण व्हावं याचं जसं प्रमाण ठरलेलं असतं तसंच मलनिस:रणही दिवसातून किती वेळा व्हायला पाहिजे याचंही प्रमाण ठरलेलं असतं म्हणूनच आयुर्वेदानुसार अथवा जीवशास्त्रानुसार शौचास जाण्याच्या प्रमाणात अचानक वाढ होणं किंवा अचानक कमी होणं ही व्याधी समजली जाते. प्रौढांमध्ये दिवसातून 2 ते 3 वेळा शौचास होणं स्वाभाविक असतं. मात्र शौचास होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्यास अतिसार झाला असं म्हंटलं जातं. लहान बालकांना दिवसातून सर्वसाधारणपणे 7 ते 8 वेळा पातळ,

चिकट, दुर्गंधीयुक्त मलाचे निस्सरण झाल्यास त्याला अतिसार झाला असल्याचं मानावं. पोटात गेलेल्या अन्नातील स्निग्ध पदार्थ पचवून शरीराकडून पोषणमूल्यांचं शोषण होण्याची क्रिया बिघडल्यास वारंवार चिकट व दुर्गंधीयुक्त जुलाब होतात. अनेकदा अतिसाराचा आजार मानसिक कारणांतही दडलेला असतो. अतिशोक, तणाव, भयग्रस्तता यांमुळेही वारंवार शौचाला होते. एका अहवालानुसार जगात वर्षाकाठी अतिसारामुळे
व कुपोषणाद्वारे 10 लक्ष मुले मृत्युच्या खाईत लोटली जातात. अतिसारामुळे मृत्यू येणाऱ्यांमध्ये प्रौढांपेक्षा

लहान मुलांचे प्रमाण तुलनेने जास्त आहे कारण लहान मुलांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण वेगानं कमी होतं. अतिसार झालेल्या 200 मुलांपैकी एका मुलाचा मृत्यू झाल्याचं एका पाहणीत निष्पन्न झालंय. मात्र फक्त आईचं दूध पिणाऱ्या मुलांना क्वचितच अतिसाराचा त्रास होतो. त्यामुळे लहान मुलांना ठराविक वयापर्यंत फक्त आईचं दूध
पाजणं अत्यंत गरजेचं असतं.
मैदा, बेसनाचे पदार्थ, वडापाव, समोसा, लोणी, चीज, पनीर, पिझ्झा, बर्गर, उत्तपा, डोसा, तसेच चायनिज यांसारख्या पचायला जड पदार्थांच्या वारंवार अतिसेवनाने अतिसाराचा त्रास उद्भवू शकतो. त्याचप्रमाणे आईस्क्रीम, शितपेयं,बियरसारख्या अतिथंड पदार्थांच्या सेवनानेही अतिसाराचा त्रास होऊ शकतो. मांसाहारी पदार्थाचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन, तेलकट, तिखट आणि चिवडा-फरसाणासारख्या मसालेदार पदार्थांच्या अतिसेवनानेही हगवणीचा त्रास उद्भवू शकतो. आयुर्वेदात वर्णन केलेल्या विरुद्धाहारामुळेही हगवणीची समस्या निर्माण होऊ शकते. दूध आणि मासे, दूध आणि केळी यांसारख्या पचनक्रियेला त्रासदायक विरूद्धाहारामुळे अतिसार झाल्याचं पाहायला मिळतं. अगोदर खाल्लेल्या अन्नाचं पुरेसं पचन होण्याआधी पुन्हा जेवण केल्यानं अपचनाचा त्रास होतो आणि त्याचं पर्यावसान हगवणीत होतं. मात्र या प्रासंगिक अतिसाराशिवाय कित्येकदा आतड्यांचे विकार, काही जुनाट आजार तसेच अतिरक्ताल्पता यामुळेही अतिसाराचा त्रास होत असतो.
अतिसाराची लागण झाल्यावर वारंवार तहान लागणं, शौच करताना असह्य वेदना होणं तसेच प्रचंड अशक्तपणा येणं, झपाट्याने वजन कमी होणं, शौचातून रक्त पडणं यांसारखी लक्षणं जाणवू लागतात. अतिसार झालेल्या रुग्णाचं शरीर थंड पडणं, शरीरातले त्राण निघून जाणं, चक्कर येऊन डोळ्यांपुढे अंधाऱ्या येणं, मूत्रविसर्जनाच्या तक्रारींत वाढ होणं, श्वासोच्छवास तसेच हृदयांच्या ठोक्यांचा वेग
वाढणं, तोंडाला कोरड पडणं, त्वचा सैल आणि निळसर पडणं इत्यादी लक्षणं दिसतात.

मुळात अतिसाराचा त्रास सुरू झाल्यावर लगेचच काही घरगुती उपाय करता येतात. 1) बिन दुधाच्या कपभर गरम चहात अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेतल्यानं हगवण नियंत्रणात येण्यास मदत होते. 2) दोन चमचे डाळिंबाच्या पानांच्या रसात चमचाभर साखर टाकून घेतल्यानेही हगवण थांबते. 3) ग्लासभर नारळाच्या पाण्यात चमचाभर जिरे वाटून टाकल्यानेही आराम मिळतो. 4) पाण्यात उकडलेली कच्ची पपई दिवसातून दोन ते तीन वेळा खावी. 5) हगवण नुकतीच सुरू झाली असेल तर आयुर्वेदात लंघन म्हणजेच उपवासाचा चांगला उपाय सुचवलेला आहे.

अतिसाराचा त्रास होत असलेल्या व्यक्तींना झपाट्याने अशक्तपणा येतो आणि शरीरातील पाण्याचं प्रमाणही वेगानं घटतं. म्हणून संपूर्ण बेडरेस्ट घेणं गरजेचं असतं. शरीरात पाण्याचं प्रमाण संतुलित राखण्यासाठी दिवसातून चार ते पाच वेळा नारळपाणी घ्यावं. त्याचप्रमाणे अर्धा लीटर पाण्यात चार चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ टाकून केलेलं मिश्रण दिवसातून शक्य तितक्या वेळा घ्यावं. साबुदाण्याची गंजी, तांदळाची पेजही प्यावी. पाणी उकळून थंड करूनच प्यावं. उकळून थंड केलेलं पाणी जास्तीत जास्त वेळा प्यावं. अतिसारात पाणी, विविध सरबते, फळांचे रस, नारळपाण्यासारखे द्रवपदार्थ भरपूर प्यावेत. ताजे व गरम अन्न खावे, उघड्यावरचे बाहेरील खाद्यपदार्थ तसेच
शिळे अन्न टाळावं. तसेच अतितिखट पदार्थही काटाक्षाने वर्ज्य करावेत.

कित्येकदा घरगुती उपाय करूनही हगवण थांबत नसेल तर तज्ज्ञ डोक्टरांचा सल्ला घेऊन अवश्यकता असल्यास रुग्णालयात दाखल व्हावं. त्याचप्रमाणे अतिसाराच्या आजारातून बाहेर पडल्यावरही अतिसार पुन्हा उद्भवू नये
म्हणून योग्य काळजी घ्यावी लागते. हगवण थांबली असली तरी खाण्यापिण्याचं प्रमाण एकदम वाढवू नये. टप्प्याटप्प्याने जेवण वाढवल्यास पोटाच्या आतड्यांना होणारा त्रास टाळणं सोपं जातं.


डॉ. कीर्ती प्रवीण ढोबळे,
मानसरोवर, नवी मुंबई

बुधवार, ३० नोव्हेंबर, २०११

एनिमिया : काळजी आणि आहार

शरिरात रक्ताचं प्रमाण कमी होणं म्हणजेच पंडुरोग, याला इंग्रजीत एनिमिया असं म्हणतात. घडाळ्याच्या काट्यांना टांगलेल्या आणि कॅलेंडरच्या आकड्यांना बांधलेल्या हल्लीच्या धकाधकीच्या जीवनमानात एनिमियाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसतं. आयुर्वेदानुसार अप्राकृत आहार घेण्यामुळं पचनाच्या समस्या निर्माण होतात किंवा शरिराला आवश्यक पोषणमूल्य न मिळाल्यानं शरिरातील रक्ताचं प्रमाण घटतं. विशेषत: अतितिखट, आंबट, तेलकट, मसालेदार तसेच पचायला जड पदार्थांचं वारंवार सेवन केल्यानं शरिराला पोषणमूल्य कमी मिळतं आणि अप्राकृत रक्ताचं प्रमाण वाढल्यामुळे शरिरात प्राकृत रक्ताचं प्रमाण घटतं. एनिमिया होण्याचं आणखी एक कारण मानसिक आजारांतही दडलेलं आहे. सततच्या भय, चिंता, शोकामुळेही रक्ताल्पता वाढते. आधुनिक आणि मुख्यत्वेकरून पाश्चिमात्य देशातील खाद्यसंस्कृतीच्या अतिरेकामुळे रक्ताल्पतेचं प्रमाण वाढू लागलंय. याचं मुख्य कारण म्हणजे त्या-त्या देशातील खाद्यपदार्थ हे त्या देशातील पर्यावरण आणि भौगोलिक परिस्थितीनुसार तिथल्या नागरिकांना पोषक ठरतात मात्र त्याचं अंधानुकरण करताना आपल्या देशातील पर्यावरणीय परिस्थितीही लक्षात घेणं गरजेचं असतं.

आधुनिक शास्त्रानुसार आहारात लोहांश कमी असणं हेही एनिमियाचं कारण सांगितलं जातं. शरिराच्या सर्वार्थाने वाढीसाठी आवश्यक पालेभाज्या, फळे, दूध आणि दुधाचे पदार्थ अंडी, मांस, मासे खाणं कित्येकदा अवास्तव महागाईमुळे गोरगरीब जनतेला परवडत नाही. यामुळे रक्ताल्पता वाढीस लागते आणि त्याचं पर्यावसान शेवटी एनिमियात होतं. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या स्त्रियांच्या आरोग्याबाबतच्या अहवालानुसार भारतात 80 टक्क्यांपेक्षा जास्त स्त्रियांना आयर्न डेफिशियन्सी अ‍ॅनिमिया (लोहाच्या कमतरतेमुळे होणारा अ‍ॅनिमिया) होतो. जगातील सुमारे 40 टक्के स्त्रियांमध्ये लोहाचं प्रमाण कमी आढळलं तर भारतीय स्त्रियांमध्ये लोहाचं प्रमाण 50 ते 52 टक्क्यांनी कमी असल्याचं समोर आलं.

लोहाची गरज पुरुषांपेक्षा स्त्रियांना तुलनेने जास्त असते. मुख्यत्वेकरून स्त्रियांच्या आहारातलं लोहाचं प्रमाण कमी झाल्यास मासिकपाळीच्या समस्यांमध्ये वाढ होते. आतडय़ांच्या, जंतांच्या आजारांतही वाढ होते. अशक्तपणा, चक्कर येणे, भूक न लागणे ही लोहाचं प्रमाण कमी होण्याची मुख्य लक्षणं आहेत. तसंच बाळंतपणातील सिझेरीयननंतर प्रमाणापेक्षा जास्त रक्तस्राव झाल्यामुळेही बाळंतपणानंतर स्त्रियांच्या शरिरात लोहाची कमतरता निर्माण होऊ शकते. अर्भके आणि लहान मुलांच्या शरिरातील रक्ताल्पतेमुळे त्यांना तोल सांभाळणे, किंवा योग्य कालावधीत सुसंगत शारीरिक हालचाली होण्यासही अडथळे निर्माण होतात. रक्ताल्पतेची समस्या असणाऱ्या लहान मुलांची मानसिक तसेच बौद्धिक वाढ खुंटण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे लहान मुलं उत्तरोत्तर एकलकोंडी आणि संकुचित मनोवृत्तीची बनतात.

लहान मुलं लोहाचा योग्य साठा घेऊनच जन्माला येत असतात. मात्र हा लोहाचा साठा आईचं दूध जोपर्यंत बाळाच्या पोटात जातंय त्यानंतर काही दिवसच पुरत असतो. त्यामुळे स्तनपानाच्या काळात आईच्या रक्तातील लोहाचं प्रमाण कमी होत जातं. त्यामुळे बाळंतपणानंतर आईला लोहगुणसंपन्न आहार देणं क्रमप्राप्त ठरतं. कित्येकदा आवश्यकतेनुसार बाळंतपणानंतर आईला गोळ्यांद्वारे लोहाचा पुरवठा करणं गरजेचं असतं.

कित्येकदा निरनिराळ्या औषधांमधून अॅस्पिरिन, पॅरासिटामोल सारखे वैद्यकीय घटक पोटात गेल्याने लाल रक्तपेशी कमी होतात आणि रक्ताल्पता होण्याची दाट शक्यता असते. तसेच केमिकल क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीत रक्ताल्पतेचं प्रमाण वाढताना दिसतं. कित्येकदा मोठ्या आजारपणानंतर शरिरातील लोहाच्या प्रमाण तपासणं गरजेचं असतं. मलेरिया, टायफॉईड, जुना ताप, काविळ यांसारख्या आजारातही एनिमिया होण्याची शक्यता असते.

त्वचेला एकप्रकारचा रुक्षपणा, त्वचा पांढरी दिसणे, कानात आवाज आल्याचे भास, जिभेची चव हरपणे, अल्प श्रमानेही थकल्यासारखं वाटणं, डोळ्यांभोवती तसेच पायाला सूज येणं, वारंवार अंग दुखणं, मांड्या, पाय तसेच कंबरेचं वाढणं आणि मुख्यत: सारखी झोप येत राहाणं इत्यादी एनिमिया म्हणजेच रक्ताल्पतेची लक्षणं मानली जातात. यापैकी कोणतीही लक्षणं जास्त दिवस दिसून आल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य त्या तपासण्या करून घेणं आवश्यक आहे. योग्य तपासण्यांनंतर एनिमिया अर्थात पंडुरोग झाल्याचं निष्पन्न झाल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करावा.

कित्येकदा अॅनिमिया झालेले रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय लोहाच्या गोळ्या घेतात. मात्र लोहाच्या गोळ्यांचा अतिरेक झाल्यास मलावरोध, उलट्या, वारंवार शौचाला होणं (बऱ्याचदा काळ्या रंगाचा शौच पडणं), पोट बिघडणं, आजारी असल्यासारखं वाटणं इत्यादी त्रास होऊ शकतात. म्हणून तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच लोहाच्या गोळ्या घ्याव्यात.

करावाच मात्र शरिरातील लोह आणि रक्तप्रमाण वाढण्यासाठी काही पथ्य पाळत आहारात थोडे बदल करणं गरजेचं असतं. पौष्टिक आहाराबरोबरच '' जीवनसत्व असणाऱ्या पदार्थांचं सेवन वाढवावं. नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने व्यस्त जीवनपद्धतीत जेवणाच्या वेळा टाळून चहा, कॉफी घेण्याचं प्रमाण नकळत वाढतं. त्यामुळे चहा, कॉफीचं प्रमाण नियंत्रणात ठेवावं. बाहेरचे पदार्थ शक्यतो टाळावं. आहारात विविधप्रकारच्या पालेभाज्यांचा समावेश असावा. चाकवत, पालक, मेथीच्या भाज्यांचं सेवन वाढवावं. त्याचप्रमाणे आहारात गाजर, बिटाचं प्रमाणही ठेवावं. शेगदाण्याचे लाडू, चिक्की काही वेळेनंतर अवश्य खावी. अंजीर, खजूर, खारीक, खोबरे तसेच मनुक्याचं प्रमाणही वाढवावं. अॅनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींसाठी फलाहारही महत्त्वाचा असतो. म्हणूनच जेवणानंतर सफरचंद, द्राक्षे, चिकू, पपई तसेच टरबुजासारख्या फळांचं सेवन अवश्य करावं.

हल्लीची तरुणाई फिटनेसबाबत अधिक सजग असते. त्यासाठी डाएटिंगचा फंडा वापरला जातो. मात्र डाएटिंगचा एवढा अतिरेक होतो की शरिराला आवश्यक असणाऱ्या ऊर्जास्त्रोतांची रसद तोडली जाते आणि मग अशक्तपणा वाढतो. डाएटिंगसाठी उपाशी राहण्याचे प्रमाण वाढले तर रक्ताल्पता वाढते आणि अॅनिमियाचा धोका संभवतो. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच डाएटिंग करावं. डाएटिंग करताना दर दोन ते तीन तासांनी पुरेसा शरिराला पोषक आहार घ्यावा.


डॉ. कीर्ती ढोबळे, नवी मुंबई

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०११

हिवाळ्यातील आजार आणि घरगुती उपचार

हिवाळ्यात वातावरण कसं असतं, मस्त गाऽऽर…अगदी थंड
वाटतं थंडीत कधी, करूच नये निद्रादेवीशी बंड ॥

सूर्यदेवही जांभया देत, जरा उशिराच उठतो गारठून
गुलाबी थंडीत आपल्या, सोनेरी किरणांची नक्षी पसरून ॥

रखरखीत उन्हाची काहिली देणारा उन्हाळा, चिंब भिजवणारा पावसाळा आणि थंडीने हुडहुडी भरायला लावणारा हिवाळा अशा तीन ऋतूंपैकी गुलाबी थंडीचा हिवाळा प्रत्येकालाच हवाहवासा असतो. हिवाळा सुरू झाला आणि थंडीची चाहूल लागली की अडगळीत पडलेले स्वेटर, मफलर तसेच लहान मुलांच्या कानटोप्या, पायमोजे बाहेर येऊ लागतात. मुळात वातावरणात गारवा असल्याने हिवाळ्यात इतर ऋतूंच्या तुलनेत पचनशक्ती चांगली असते. त्यामुळे या काळात भूक चांगली लागले. म्हणूनच हिवाळ्यात सर्वप्रकारचा समतोल आहार घ्यावा. विशेषत: या काळात शरिरातील रुक्षता वाढत असल्याने स्निग्ध पदार्थांचे सेवन वाढवावे. हिवाळ्यात विशेषत्त्वाने काजू, बदाम, अंजीर, आक्रोड, खारीक, खोबरे, बेदाणे इत्यादी पदार्थांचं सेवन आपल्या प्रकृतीनुसार वाढवावं. हिवाळ्यात डिंक, सुकामेवा, बेसन, मेथी इत्यादींचे साजूक तुपात तळलेले लाडू शरिराला बलवर्धक ठरतात. हिवाळ्यात रात्र मोठी आणि दिवस तुलनेने लहान असतो त्यामुळे या काळात वारंवार

भूक लागते. त्यामुळे सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, रात्रीचं जेवण गरमागरम आणि पौष्टिक घ्यावं. या काळात सर्व
प्रकारच्या पालेभाज्या, फळे, फळांचा रस सेवन करावा. मात्र ज्यांना वजन कमी करायचे आहे किंवा मधुमेहासारखा
त्रास असणाऱ्या व्यक्तींनी आहारतज्ज्ञ किंवा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आहारात बदल करावेत.

थंडीची मौज प्रत्येकालाच स्वर्गीय सुखकारक वाटत असली तरी थंडीत आरोग्याचेही अनेक प्रश्न निर्माण होत असतात. थंडीत मुख्यत्वेकरून सांध्यांचे जुनाट आजार, त्वचेच्या समस्या त्याचप्रमाणे फ्रॅक्चर झालेल्या हाडांच्या

समस्या तोंड वर काढतात. नेहमी दुखत असलेल्या शरिराच्या
एखाद्या अवयवाचं दुखणं थंडीत असह्य होतं. थंडीत उद्भवणाऱ्या अशाच काही समस्यांचा आणि त्यांवरच्या उपायांचा परामर्श आपण आज घेणार आहोत.
सांधेदुखी- थंडीच्या दिवसांत मुख्यत: सांधेदुखीची समस्या डोकं वर काढते. सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी थंडीत सांध्यांची विशेष काळजी घेण्याची गरज असते. सांध्यांना थंड हवा लागू देऊ नये त्याचप्रमाणे पायांना, हातांना मोजे वापरावेत. थंड पाण्यात काम करणं टाळावं. शिळं आणि थंड अन्न घेऊ नये. बटाटे, उसळी, ब्रेड तसेच बेकरीचे
पदार्थ, डाळी आणि डाळींच्या पीठाचे पदार्थ टाळावेत. मांसाहार पूर्णत: वर्ज्य करावा. गरम, ताजे अन्न घ्यावे. थंड पाण्यापेक्षा कोमठ पाणी प्यावं. सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी थंडीच्या दिवसांत अतिश्रम करणं टाळावं. रात्री झोपताना सांध्यांना एरंडेल तेलाने मालिश करावं. विविध प्रकारचे गुग्गुळ, दशमुळांचा काढा तसेच इतर वनौषधींचा उपयोग वैद्यकीय सल्याने केल्यास सांधेदुखीचा त्रास आपण टाळू शकतो.

दमा- दम्याचा त्रास असणाऱ्यांना हिवाळा अत्यंत तापदायक ठरू शकतो. थंडीत छातीत कफ साचण्याची शक्यता जास्त असल्याने दम्याचा त्रास वाढू शकतो. म्हणून दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी थंड पाणी, आईसक्रीम,

कोल्ड टी तसेच कोल्ड कॉफी तसेच विविध शितपेयं कटाक्षाने टाळावीत. दही, ताक, दूध, मिठाई दम्याच्या त्रासाला आमंत्रण ठरू शकतात त्यामुळे अशा पदार्थांचं सेवन टाळावं. दम्याचा त्रास असणाऱ्यांनी पाणी सहसा कोमठ करून प्यावं. सुंठ आणि मध किंवा आल्याचा रस आणि मध हे मिश्रण दम्याच्या रुग्णांसाठी हिवाळ्यात आरोग्यदायी ठरतं. रात्री झोपताना तसेच सकाळी अंघोळीपूर्वी छातीला तीळतेल, महानारायण तेल लावून दररोज शेक घ्यावा त्यामुळे छातीत साचलेला कफ मोकळा होण्यास मदत होते. आयुर्वेदातील वमन हा उपक्रम दम्याचा त्रास कमी करण्यास मदत करतो. तसेच दम्याचा त्रास असणाऱ्यांनी 2 ते 3 कप पाणी घेऊन त्यात तुळस, अडुळशाची प्रत्येकी दोन पाने टाकावी आणि एक कप काढा राहील अशा रितीने उकळून कोमठ काढा रात्री झोपताना किंवा सकाळी घ्यावा. त्याचप्रमाणे कोबी पाण्यात टाकून गरम करून त्याची वाफ घ्यावी. दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्राणायाम, कपालभारतीसारखे श्वसनसंस्थेशी संबंधित व्यायाम करावेत. च्यवनप्राश, सितोपलादी चूर्ण इत्यादी आयुर्वेदिक उपायही तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावेत.


तळपायाच्या भेगा- हिवाळ्यात अनेकांच्या हातापायांच्या तळव्यांना भेगा पडतात. काही वेळेस या भेगा एवढं
उग्ररुप धारण करतात की भेगांतून रक्तही येतं आणि वेदना असह्य होतात. थंडीमध्ये शरिरात रुक्षता म्हणजेच कोरडेपणा येतो आणि हातापायाच्या तळव्यांवरील त्वचा फाटते. त्वचा फाटल्याने भेगा तयार होता आणि त्या दुखतात किंवा अशा भेगांची आग होते. रुक्षान्नाच्या अतिसेवनामुळेही भेगा पडण्याचा आजार बळावू शकतो. म्हणून हातापायांच्या तळव्यांना भेगा पडण्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी आहारात साजूक तुपाचा समावेश करावा. आहारात दूध, तुपासारखे स्निग्ध पदार्थ वाढवावेत. लोणचे, मिरचीचा ठेचा तसेच अतितिखट पदार्थ कटाक्षाने टाळावेत. जागरणामुळेही शरिरात रुक्षता वाढत असल्याने रात्री जागरण करणं टाळावं. रात्री झोपताना भेगांना साजूक तूप लावावे. चंदन, लाख, ज्येष्ठमध त्याचप्रमाणे तज्ज्ञांच्या सल्ल्याने विविध औषधी तेल भेगांवर लावावीत. ज्येष्ठमध साजूक तुपात टाकून पिल्यामुळंही भेगांचा त्रास कमी होण्यास मदत होते.

त्वचेची काळजी- हिवाळ्यात साधारणपणे रात्री थंड आणि दिवसा कडक उन असं वातावरण असल्याने त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. थंडीमुळे त्वचेतल्या तैलग्रंथी निष्क्रीय होऊन त्वचा निस्तेज आणि रखरखीत बनते. चेहऱ्यावर सुरकुत्या, त्वचा फाटणे, ओठ फुटणे अशा तक्रारी वाढतात. म्हणून हिवाळ्यात त्वचेची खास काळजी घ्यावी लागते. घराबाहेर पडताना चांगले विंटरकेअर लोशन वापरावे. असे विंटरकेअर लोशन आयुर्वेदिक असेल तर उत्तमच. अंघोळीनंतर घरगुती उपाय म्हणून खोबरेल तेल, तिळाचे तेल, साय, लोणी तसेच तुपाचाही वापर क्रीमऐवजी करावा. हिवाळ्यात त्वचा स्निग्ध आणि कांतीमय ठेवण्यासाठी आहारात थोडे बदल करावेत. मोसंबी, हिरव्या भाज्या, पालेभाज्या, सॅलडचे आहारातील प्रमाण वाढवावे. पिकलेल्या पपईचा गर चेहऱ्यावर लावल्यास चेहरा सतेज दिसतो. त्याचप्रमाणे संत्र्याचा रस, संत्र्याची साल, काकडीचा रस चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्याचा काळवंडलेपणा कमी होतो. रात्री झोपताना साय किंवा तूप घेऊन त्यात चंदन टाकून मालिश केल्यानेही त्वचेला तेज प्राप्त होऊ शकते.

डॉ. कीर्ती प्रवीण ढोबळे, नवी मुंबई
संपर्क- 08655185968





शनिवार, २४ सप्टेंबर, २०११

काविळ आणि घरगुती उपाय

काविळ झाली आहे त्याला सर्वच पिवळं दिसतं असं आपण अनेकांना उपहासाने म्हणतो. मात्र या उक्तीचा काहिसा संबंध काविळ या आजारातील लक्षणांमध्ये दडलेला आहे. काविळीला कामला या नावानेही ओळखले जाते. मूळ संस्कृत कामला शब्दाचा अर्थ सर्व इच्छा नाहिसा करणारा आजार असा आहे. पावसाळा सुरू झाल्यावर किंवा पावसाळा संपल्यानंतर काविळीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होते. काविळ आणि काविळीवरील उपचारांबाबत अनेक समज-गैरसमज असले तरी दूषित पाण्यामुळे तसेच दूषित अन्न सेवनामुळे काविळ होते. काविळ होऊ नये याबाबत प्रतिबंधात्मक उपाय, आहार-विहाराबाबत तसेच काविळ झाल्यानंतर करावयाच्या उपचाराबाबत आयुर्वेदात खूप सोपे आणि चांगले उपाय सांगितले आहेत.


मुळात यकृतातील पेशींना इजा झाल्यानं त्यांना सूज येते आणि यकृताच्या कार्यात अडचणी निर्माण होतात. परिणामी रक्तातील

पित्तयुक्त द्रव्याचे प्रमाण वाढते. हे वाढलेलं पित्तयुक्त द्रव्य डोळ्यांतील बुबुळ वगळता असलेला पाढंरा भाग, त्वचा तसेच हातापायाची नखे अशा भागांतं साचून राहतं. त्यामुळे शरीराला एकप्रकारचा पिवळेपणा येतो. मूत्राद्वारेही या पित्तयुक्त द्रव्याचा निच

रा होत असल्याने लघवी पिवळी होते. पित्तयुक्त द्रव्याचं प्रमाण जास्त प्रमाणात असेल तर लघवीला कित्येकदा लालसर रंग येतो. यकृताच्या कार्यात बिघाड झाल्यानं तसेच रक्त आणि मूत्रात पित्तजन्य पेशींचं प्रमाण वाढल्यानं पचनाच्या तक्रारींत वाढ होते. लाल रक्तपेशींचा वेगाने नाश होऊन बिलिरुबीन वाढणं (लहान बाळांना जन्मत: होणारी कावीळ). पित्तमार्गातील अडथळ्यामुळे यकृतात

पित्त साठून ते रक्तात उतरणं म्हणजेच काविळ होय.

काविळ झाल्यावर अन्न पचनाच्या तक्रारी वाढल्यानं कित्येकदा व्यक्तीला उलट्या होतात आणि परिणामी अशक्तपणा वाढतो. त्यामुळे चक्कर येण्याचे प्रमाणही वाढण्याची शक्यता असते. हातापायाचे गोळे दुखण्याच्या तक्रारी उद्भवतात. काविळ झालेल्या व्यक्तीला सारखं झोपावसं वाटतं. चेहरा आणि संपूर्ण शरीर निस्तेज होतं. भूक मदावते आणि अन्न पाण्यावरची इच्छा नाहिसी होते. सतत ताप येणं, डोकेदुखी, अंगदुखी, भूक नसणं, मळमळणं ही अगदी प्राथमिक लक्षणं आहेत. पोटाच्या वर उजव्या बाजूला वारंवार दुखतं. रक्त तपासणीत काविळीचा समजतो. पॅथॉलॉजी लॅबमध्ये लघवीची तपासणी केली असता काविळीचं निदान होतं. काविळी झाली आहे की नाही याचं निदान घरगुती पद्धतीनेही करता येतं. छोट्या बाटलीत साठवलेल्या लघवीत कापूर बुडवल्यास कापराला पिवळसर रंग चढल्यास त्वरीत डॉक्टरांना दाखवून योग्य त्या तपासण्या करून घ्याव्यात.

योग्य तपासण्यानंतर काविळ झाली असल्याचं निदान झाल्यास काविळग्रस्त व्यक्तीनं आहार-विहारात महत्त्वाचे बदल करणं खूप

गरजेचं असतं. कारण काविळ हा आजार बरा होण्यासाठी जशी औषधोपचारांची गरज असते तशीच पथ्यपालनाचीही नितांत गरज असते. काविळ झालेल्या रुग्णाची सुमारे पंधरा दिवस ते महिनाभर काळजी घेणं गरजेचं असतं. सुमारे महिनाभर पूर्ण आराम करावा, मात्र जास्त झोपू नये. उन्हात फिरणं टाळावं. काविळ झालेल्या व्यक्तीनं काजू, बदाम, खोबरे, तळलेले तसेच मसालेदार तिखट पदार्थ त्याचप्रमाणे पचायला जड पदार्थ वर्ज्य करावेत. उघड्यावरचं अन्न खाणंही कटाक्षानं टाळावं. दूध आणि दुधाचे पदार्थ तसेच मांसाहार पूर्णत: वर्ज्य करावा. पोट साफ होण्यासाठी त्रिफळा चूर्णासारखे उपाय करावेत. मद्यपान तसेच तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन पूर्णत: टाळावं. पाणी उकळून थंड करूनच प्यावं.

काविळ झालेल्या लहान मुलांना काळ्या मनुक्याचं पाणी आणि प्रौढ व्यक्तींना पाण्यात भिजवलेले काळे मनुके खाण्यास द्यावेत. लाह्या, उकडलेल्या ताज्या भाज्या, तांदूळ किंवा ज्वारीची भाकरी, मुगाची आमटी तसेच पालक-टोमॅटो-दुधी-कोबीचं कोमठ सूप, भाताची पेज, मध्यम पिकलेल्या केळी यासारखे पदार्थ द्यावेत. त्याचप्रमाणे ऊस चाऊन खावा. गोड आणि ताजे ताक दिवसातून किमान दोन वेळा प्यावं. गूळ पाण्यात उकळून गाळून त्याचा काढाही दिवसातून एकदा घ्यावा.

काविळ झाल्यानंतर कित्येकदा होणारा त्रास वाढल्यास आणि किंवा उलट्यांमुळे अति अशक्तपणा आला असल्यास तसेच सारखा ताप येत असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि आवश्यक असल्यास रुग्णालयात दाखल होऊन पुढील उपचार घ्यावेत.

डॉ. कीर्ती प्रवीण ढोबळे, नवी मुबंई

संपर्क- 8655185968

गुरुवार, १ सप्टेंबर, २०११

ऐन तारुण्यात सामना मुरूमांशी







स्वच्छंदपणे बागडत विश्वाला कवेत घेऊ पाहणारं तारुण्य सर्वांनाच हवं असतं. प्रत्येकजण आयुष्यातील सर्वात सुवर्णकाळ म्हणून तारुण्याकडे पाहात असतो. मात्र याच आत्मविश्वासानं ओसंडून वाहणाऱ्या गुलाबी तारुण्याच्या समुद्राला काही समस्यांचा नावडता किनारा लाभलेला असतो. ऐन तारुण्यात सामना करावा लागणाऱ्या नावडत्या गोष्टींपैकी एक म्हणजे तारुण्यपीटिका…अर्थात मुरूमं. यालाच इंग्रजीमध्ये पिंपल्स असं म्हणतात. कोणत्याही वयातील प्रत्येक व्यक्तीला आपण सुंदर दिसावं अशी इच्छा असते. तारुण्यात तर ही इच्छा प्रबळ होतेच. मात्र याच तारुण्यात नैसर्गिकरित्या मिळालेल्या आत्मविश्वासाला काहीसा धक्का लावण्याचा प्रयत्न तारुण्यपीटिका करतात. मात्र काही पथ्य पाळली, आहारात थोडे बदल केले किंवा चेहऱ्याची योग्य काळजी घेतली तर तारुण्यपीटिकांवर मात करता येऊ शकते.

किशोर वयातून तारुण्यात पदार्पण करताना मुलं आणि मुलींच्या शरीरात महत्त्वाचे बदल होत असतात. मुख्यत: तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना यौनग्रंथी विशेषत्वाने सक्रीय होतात. यौन ग्रंथीतील अंतस्त्राव शरीराच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरतात. मात्र या अंतस्त्रावात अँण्ड्रोजनची पातळी वाढल्यावर मुरूमं येतात. तसेच मासिक पाळी येण्यापूर्वी मुलींच्या शरीरात प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढते त्यामुळे चेहऱ्यावर गालांवर, नाकांवर, कपाळावर तसेच खांदे, पाठीवर किंवा छातीवर मुरूमं येतात. ठराविक वयात शरीरात होणारे बदल आपण टाळू शकत नाही मात्र आपल्या आहार-विहारात काही बदल केल्यास आपण मुरुमांच्या त्रासाची तीव्रता कमी करू शकतो. कित्येकदा अयोग्य आणि अवेळी आहार मुरूमांना आमंत्रण ठरतो. मुरूमांचा त्रास असणाऱ्यांनी शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ टाळणं गरजेचं असतं. बदाम, आक्रोड तसेच मांसाहारासारखे गरम प्रकृतीचे पदार्थ टाळणंही आवश्यक असतं.

मुरुमांचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना तेलकट आणि हाय कॅलरी असणाऱ्या पदार्थाचं सेवन कमी करावं. बटाटा, पिझ्झा, बर्गर तसेच चॉकलेट, शीतपेयं खाणं शक्यतो टाळावं. शरीरात आयोडीन प्रमाणापेक्षा जास्त झालं तरीही मुरूमं येतात. अतितिखट किंवा अतिगोड, आंबवलेले पदार्थ तसेच कोबी, फ्लॉवर, गवार, ढोबळी मिरची, वांगे, टोमॅटो, चिंच, कैरी, दही, बेसनाचे पदार्थ, अननस वर्ज्य करावे. अर्धवट झोप किंवा मानसिक ताणतणावही मुरुमं वाढवण्यास मदत करतात त्यामुळे पुरेशी झोप घेणं आणि मानसिक तणावातून मुक्ती मिळवणं गरजेचं असतं. धूम्रपान, तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन आरोग्याला जसं अपायकारक आहे तसच मुरुमं वाढण्यासही कारणीभूत ठरतं. घामामुळं चेहरा तेलकट होऊन त्वचेवरची सूक्ष्म छिद्र बंद होतात आणि त्यामुळे पी अँक्ने नावाचा बॅक्टेरिया वाढून चेहऱ्यावर लाल पुटकुळ्या येतात. डोक्यात कोंडा झाल्यानंही मुरुमं येतात. कित्येकदा अनुवंशिकतेतूनही मुरूमं येऊ शकतात. स्त्रियांच्या मासिक पाळीत अनियमता आल्यास किंवा मासिक पाळीबाबत काही समस्या उद्भवल्यासही मुरूमांचं प्रमाण वाढतं. त्यामुळे अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं क्रमप्राप्त ठरतं. पचनासंदर्भातले गॅस, अँसिडिटीसारख्या पोटाच्या समस्या तसेच मलमूत्र विसर्गाच्या समस्याही मुरुमांना आमंत्रण ठरतात.

मुरुमांचा त्रास असणाऱ्यांनी आहारात फळं, पालेभाज्यांचा समावेश करावा. कपाळावर मुरूमं येत असल्यास केसांना तेल लावणं शक्यतो टाळावं. चेहरा दिवसातून दोन ते तीन वेळा कोमठ पाण्याने धुवून कोरड्या टॉवेलने पुसावा. चेहरा जास्तीत जास्त कोरडा राहील याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे जेवणानंतर भरपूर पाणी प्यावं. रक्तचंदन, कडूलिंबाची पानं, तुळशीची पानं मसूरडाळ यांचे समप्रमाणात मिश्रण वाटून त्याची पेस्ट करावी आणि सकाळी अंघोळीअगोदर चेहऱ्याला लावावी. चेहऱ्यावरील पेस्ट सुकल्यानंतर कोमठ पाण्यानं धुवून काढावी. तसेच डाळींब आणि संत्र्याचा सालीला थोड्या हळदीबरोबर वाटून त्यात पिकलेल्या लिंबाचा रस मिसळून मुरूमांवर लावावा. त्यामुळे् मुरूमं कमी तर होतातच पण फुटलेल्या मुरुमांमुळे चेहऱ्यावर उठलेले काळे डागही कमी होण्यास मदत होते. जायफळ तसेच रक्तचंदन उगळून चेहऱ्यावर लावल्यानेही मुरुमांचं प्रमाण कमी होतं.

मुरुमांचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी पुरेसा व्यायाम करावा. अपचनाचे त्रास होवू नयेत याची काळजी घ्यावी. चेहऱ्यावर आलेल्या मुरुमांना वारंवार हात लावू नयेत तसेच मुरुमं फोडण्याचा प्रयत्नही करू नये. मुरूमं पिकल्यावर आपोआप फुटतात. मुरूमं फुटल्यावर लगेच स्वच्छ पाण्यानं चेहरा धुवावा. त्याचप्रमाणे साबणाचा वापर टाळावा. उन्हात फिरणं शक्यतो टाळावं किंवा उन्हात फिरण्यामुळं तसेच उकाड्यामुळे चेहऱ्यावर आलेला घाम त्वरित पुसून घ्यावा. रासायनिक औषधं किंवा रासायनिक गूण असणारे वेगवेगळे मलम लावण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डॉ. कीर्ती प्रवीण ढोबळे, नवी मुंबई


रविवार, १४ ऑगस्ट, २०११

कशी करावी सांधेदुखीवर मात..?







सर्वसाधारणपणे पूर्ण वाढ झालेल्या माणसाच्या शरीरात सुमारे दोनशेहून अधिक हाडं असतात आणि या सर्व हाडांना जोडणारे त्याहीपेक्षा जास्त सांधे असतात. आपल्या शरीराची पर्यायाने हाडांची हालचाल सांध्यांच्या सहाय्यानेच होत असते. म्हणूनच शरीराच्या हालचालींत सांध्यांच्या क्रीयेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र हल्ली धकाधकीच्या जीवनात लोकांमध्ये सांधेदुखीच्या तक्रारी वाढत चालल्याचं दिसून येतं. त्यामुळे सांध्यांची काळजी घेणं क्रमप्राप्त ठरतं. कित्येकदा शेतकरी, माथाडी कामगार इत्यादी अतिश्रमाची कामं करणाऱ्या व्यक्तींचा सांधेदुखीचा त्रास तोंड वर काढतो. मात्र हल्ली कमी कष्टाची कामं करणाऱ्या व्यक्ती, गृहिणी असणाऱ्या महिला, ऑफिसात काम करणारे इतकच काय तर हल्ली शाळा-कॉलेजातील युवा पिढीलाही सांधेदुखीच्या समस्या जाणवू लागल्या आहेत.

सांधेदुखीचा त्रास उद्भवण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे हाडातील कॅल्शियमचं प्रमाण कमी होणं. बळकटीसाठी हाडांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण योग्य प्रमाणात असणं गरजेचं असतं. हाडांतील कॅल्शियमचं प्रमाण कमी झाल्यावर हाडांचा ठिसूळपणा आणि सच्छिद्रपणा वाढतो. परिणामी हाडांची झीज लवकर होते. स्त्रियांच्या बाळंतपणानंतर किंवा वयाच्या चाळीशीनंतर हाडांतील कॅल्शियम संतुलित ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करणं गरजेचं असतं. कारण बाळंतपणानंतर आणि वयाच्या चाळीशीनंतर हाडांतील कॅल्शियम कमी होण्याचा धोका जास्त असतो. मात्र कधीकधी अनुवंशिकतेतूनही सांधेदुखीचा त्रास मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे येऊ शकतो. काही व्यक्तींच्या गूणसूत्रांतच (HLA B27 किंवा HLA DR4) दोष निर्माण होतो. परिणामी बऱ्याचदा रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन जीवाणू तसेच विषाणूंची बाधा झाल्याने संधीवाताचा आजार बळावू शकतो. त्यामुळे रक्ताची तपासणी केल्यावर संधीवाताच्या मुळाशी आपण पोहोचू शकतो.

रक्तातील युरिक आम्लाचे प्रमाण वाढल्यास किंवा प्रथिनांसारख्या विशिष्ट पदार्थांचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन झाल्यासही सांधेदुखीचा त्रास निर्माण होऊ शकतो. बऱ्याचदा हल्लीच्या धकाधकीच्या आणि सुपरफास्ट जीवनशैलीत कामाचा व्याप वाढून मानसिक तणाव निर्माण होतो. परिणामी खाण्यापिण्याच्या वेळा बदलणं, पचनासंदर्भातल्या समस्या निर्माण होणं या कारणांमुळेही संधीवाताच्या समस्या निर्माण होतात. त्याचप्रमाणे कित्येकदा अतिनील किरणांमुळे किंवा विशिष्ट प्रकारच्या होर्मोन्सची प्रमाणापेक्षा जास्त वाढ होणे यामुळेही संधीवाताच्या तक्रारी वाढू शकतात. अतिमैदानी खेळ, अतिरक्तस्त्राव तसेच सांध्यांच्या ठिकाणी झालेली दुखापत यामुळेही सांधेदुखीचा त्रास बळावतो. एसी त्याचप्रमाणे थंड वातावरणातही सांध्यांचं दुखणं वाढू शकतं. त्यामुळे सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी एसीत जाणं शक्यतो टाळावं किंवा एसीत जाताना दुखणाऱ्या सांध्यांना उबदार कपड्यांनी झाकून मगच एसीत प्रवेश करावा.

सांधेदुखीचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी वातप्रकोपक अन्नाचं सेवन जास्त केल्यास सांध्यांच्या त्रासात वाढ होऊ शकते. म्हणून सांधेदुखीचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी मटकी, वाटाणा, तूर, हुलगे, हरभरा त्याचप्रमाणे चवळी इत्यादी कडधान्याचा आहारातील समावेश कमी करावा अन्यथा त्रास बरा होईपर्यंत पूर्णत: टाळावा. त्याचप्रमाणे इडली, डोसासारख्या आंबवलेल्या पदार्थांचंही सेवन करू नये. पिझ्झा, बर्गरसारख्या पदार्थांचं सेवन टाळावं. अतिस्निग्ध तसेच तळलेले, तिखट पदार्थही जास्त प्रमाणात खाऊ नये. सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी दही, ताक तसेच लोण्यासारख्या पदार्थांचं सेवन कमी प्रमाणात करावं. अवेळी जेवण किंवा भूक नसताना खाण्याच्या सवयी जशा अनेक आजारांचं कारण बनतात तशाचं या सवयी संधीवातालाही आमंत्रण ठरतात. त्यामुळे वेळेवर आणि भूक असेल तेवढंच जेवण करणं गरजेचं असतं. कारण पित्त आणि गॅस निर्माण झाल्यास सांधेदुखीचा त्रास बळावण्याची भीती असते. अतिलंघन म्हणजेच उपवासही संधीवाताला निमंत्रण देणारा ठरतो. त्यामुळे संधीवाताचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी उपवास शक्यतो टाळावेत.

सांधेदुखीचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी लघवी जास्त काळ तुंबून ठेवू नये. मल-मूत्र विसर्जन ही शरीराची नैसर्गिक आणि अपरिहार्य प्रक्रिया असल्याने ती वेळेवर करावी.

मानवी शरीरातील हाडांमध्ये एकप्रकारचा द्रव पदार्थ असतो. आपण जेव्हा हालचाली करतो तेव्हा हा द्रव पदार्थ हाडांमधील घर्षण कमी होण्यास मदत करतो. मात्र हाडांमधला द्रव पदार्थ कमी झाल्यास हाडांचं घर्षण जास्त प्रमाणात होऊन सांधेदुखीचा त्रास उद्भवतो किंवा दुर्लक्ष केल्यास हाडं ठिसूळ होऊन हाडांची मोठ्या प्रमाणात झीज होऊ शकते. त्यामुळे योग्य वेळी तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला घेणं क्रमप्राप्त ठरतं.

सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी रात्री झोपताना एरंड तेलाने दुखणाऱ्या सांध्याचं मालिश केल्यास फायदेशीर ठरतं. कारण एरंड तेलाने मालिश केल्यास विकृत वायू बाहेर पडून सांधदुखीच्या वेदना कमी होण्यास मदत होते. आहारात खारीक, खोबरे, दूध, ड्राय फ्रूट तसेच तुपाचा समावेश असावा. तसेच कॅल्शियम कमी झाल्याने सांधेदुखी वाढली असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियमच्या गोळ्या घ्याव्यात.

डॉ. कीर्ती प्रवीण ढोबळे,
मानसरोवर, नवी मुंबई (संपर्क- 9222360448)
Dr.kirtidhobale@gmail.com

रविवार, ७ ऑगस्ट, २०११

आला पावसाळा....आरोग्य सांभाळा..!





पहिला पाऊस मातीचा स्वर्गीय सुगंध देतो....उकाड्याने व्याकूळ झालेल्या जीवाला आल्हाददायक गारवा देतो. निसर्गाच्या नाना कला दाखवतो. डोंगर, दऱ्या, शेत-शिवाराला हिरवी झालर चढवतो पण चिंब कोसळून रान आबादानी करणारा पाऊस आपलं आरोग्यही आबादानी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात वातावरण साधारणपणे आणि तुलनेने थंड असल्याने तसेच वातावरणात एकप्रकारचा ओलावा असल्याने योग्य काळजी न घेतल्यास आरोग्याच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. त्यातच कामाधामानिमित्ताने घराबाहेर पडणाऱ्यांना कित्येकदा पावसात भिजावं लागतं आणि त्यातच पावसाळ्यात अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचून दुर्गंधी निर्माण झालेली असते. रस्त्यांवरील खड्य़ांत, घराच्या छतावर, गॅलरीतल्या झाडांच्या कुंड्यांमध्ये, अंगणातल्या सखल भागात पाणी साचून राहिल्याने त्या पाण्यावर डासांचं राज्य निर्माण होतं. डासांचा प्रादुर्भाव वाढल्यानं मलेरिया, डेंग्यू, टायफॉईड, काविळीसारख्या आजारांना आयतं आमंत्रण मिळतं. त्यामुळे खासकरून पावसाळ्यात आरोग्याची जास्त काळजी घेणं क्रमप्राप्त ठरतं.

आयुर्वेदात ऋतुचर्येचे आदानकाळ आणि विसर्गकाळ अशा दोन भागांत विभाजन केले आहे. आदानकाळातील शिशिर, वसंत, ग्रीष्म या ऋतुत मनुष्यबळ उत्तरोत्तर तुलनेने क्षीण होत जाते. याच आदानकाळानंतर वर्षा ऋतूचे आगमन होते. त्यामुळे आधीच क्षीण झालेलं शरीर आणि मंदाग्नी यावर पावसाळ्यातील थंड हवेचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते. परिणामी वातदोष, पित्तदोष तोंड वर काढण्याची दाट शक्यता असते. त्याचप्रमाणे अतिसार, प्रवाहिका, ग्रहणी, आम्लपित्त, अपचन, अरुची तसेच उदरशूल यांसारखे पचनसंस्थेचे आजार आणि दमा, सर्दी, खोकल्यासारखे श्वसनविकार जडण्याची भीती असते. हातापायांना चिखली, नायटा तसेच विविध बुरशीजन्य त्वचाविकारही जडण्याची शक्यता पावसाळ्यात जास्त असते.

वातदोष असणाऱ्यांनी थंड हवेपासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा. रात्री झोपताना तेलाने सांध्यांचं मालिश करावं. त्रासदायक व्यायाम तसेच सांध्यांवर ताण आणणारे योग टाळावेत.

पित्तदोष असणाऱ्यांनी पचायला हलकं जेवण घ्यावं. तसेच रात्री झोपताना दूध प्यावं. कमी मीठ असलेले आणि कमी तिखट पदार्थ खावेत. पित्तदोष असणाऱ्यांनी जागरण टाळावं. वेळी-अवेळी खाणं टाळावं. शिळं अन्न खाणंही टाळावं. शीतपेय, जंक फूड टाळावं. लिंबूपाणी, नारळपाणी वरचेवर घ्यावं.

त्वचाविकार होऊ नये म्हणून पावसाळ्यात भिजलेलं अंग त्वरित कोरडं करून घ्यावं, बाहेर पडताना पाय भिजू नयेत असे बूट घालावेत. चुकून बुटात पाणी शिरलंच तर त्वरित ते कोरडे करून मगच घालावेत. रात्री झोपताना खोबऱ्याचं तेल हातांना तसेच पायांना लावावं. ओले कपडे जास्तवेळ अंगावर ठेऊ नयेत.

अतिसार किंवा हगवण लागण्याचीही शक्यता पावसाळ्यात जास्त असते. अशावेळी दूध न घातलेल्या एक कप कोऱ्या चहात अर्ध लिंबू पिळून प्यावं. तासाभरात फरक पडतो. त्याचप्रमाणे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊ नये म्हणून मीठ-साखर-पाण्याचं मिश्रण दिवसातून शक्य तितक्या वेळा घ्यावं. अर्धा चमचा सुंठ मधासोबत घेतल्यास पोटाच्या तक्रारी दूर राहतील. कडूनिंबाची पाने वाटून त्यात गिलोय चूर्ण आणि आवळा चूर्ण मिसळा. या तीन्हींचा ताजा रस काढून सेवन करा. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

सर्दी झाल्यास 2 कप पाण्यात तुळशीची 10 ते 12 पाने, थोडे आले, गुळ टाकून उकळून घ्यावं आणि गाळून घेऊन दिवसातून किमान दोनवेळा घ्यावं. तसेच मूठभर चिरलेला कोबी आणि वाटलेला कापूर उकळत्या पाण्यात टाकावा आणि नाक व तोंड उघडून वाफ घ्यावी. दिवसातून दोन ते तीन वेळा वाफ घेतळ्यानं सर्दी कमी होण्यास मदत होते. कधीकधी सर्दी वाढल्याने कफ वाढून तो छातीत जाऊन साचतो. अशावेळी सूंठ किंवा वाळूची पुरचुंडी करून ती तव्यावर गरम करावी आणि छातीवर 5 ते 10 मिनीटं शेक द्यावा. त्यामुळे छातीत साचलेला कफ वितळण्यास मदत होते. सर्दी झाली असल्यास केळी, दही, ताक सेवन कमी करावं.

खोकला येत असल्यास चमचाभर आल्याचा रस तेवढ्याच मधात टाकून चाटण करावं. तसेच तुळशीच्या पानांचा आणि लवंग यांची काढा करून घ्यावा. तेलकट, थंड पदार्थ टाळावेत. तसेच रात्री झोपताना हळद टाकून गरम केलेलं दूध घ्यावं. लहान मुलांना खोकला येत असल्यास दुधात सूंठपूड, मिरे आणि हळद घालून द्यावं.


ताप आल्यास त्रिभूवन कीर्तीरस, अमृतारिष्ठ या आयुर्वेदिक औषधांचा वापर करावा. पचायला जड अन्न टाळावं. मुगाची खिचडी, तांदळाची पेज, डाळ-भातासारखे हलके पदार्थ खावेत. ताप असलेल्या काळात दुधाचं सेवन शक्यतो टाळावं. त्याचप्रमाणे तेलकट, तिखट पदार्थ तसेच मांसाहार पूर्ण वर्ज्य करावा. मिठाच्या पाण्यात कापड भिजवून अंग पुसून काढावं. मिठाच्या पाण्याने भिजवलेला रुमाल डोक्यावर ठेवावा. त्याचप्रमाणे डोक्याला हळद आणि चंदनाचा लेप द्यावा. दिवसभरात ताप न उतरल्यास तज्ज्ञ डॉक्टरला दाखवावं.


पावसाळ्यात नेहमी उकळलेलं पाणी प्यावं. घराच्या परिसरात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. घराच्या परिसरातील आणि घरातल्या कचऱ्याची वेळेत विल्हेवाट लावावी. त्याचप्रमाणे घरात भांड्यातल्या पाण्याचा साठा जास्त दिवस ठेऊ नये. डास घरात येऊ नयेत म्हणून खिडक्यांना जाळी लावून घ्यावी. रात्री उघडं झोपू नये. अंगावर घेऊनच झोपावं. घरातलं वातावरण उबदार ठेवण्याचा प्रयत्न करावा. मुळात पावसाळ्याचे दिवस हे सणवाराचे आणि वृतवैकल्याचे असल्याने खाण्याबाबत खूपवेळा बदल संभवत असल्याने विशेष काळजी घेण्याची गरज आहे. सणासुदीला चटकदार आणि मसालेदार पदार्थ कमी खावेत. त्याचप्रमाणे उपवासादिवशी साबुदाणा खिचडी, साबुदाण्याचे पदार्थ तसेच बटाट्याचे पदार्थ पचायला जड असल्याने असे पदार्थ कमी प्रमाणात खावेत. उपवासादिवशी भगर, राजगिऱ्याचे लाडू, गूळ-शेंगदाणे, खजूर त्याचप्रमाणे विविध प्रकारची फळे खावीत. अशाप्रकारे पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेतली तर हवाहवासा वाटणारा पावसाळा आपण मस्त एन्जॉय करू शकतो.


डॉ. कीर्ती ढोबळे,
मानसरोवर, नवी मुंबई.
Dr.kirtidhobale@gmail.com
9222360448

शुक्रवार, २९ जुलै, २०११

कसा असावा चिमुकल्यांचा आहार..?

‘अन्न हे पूर्णब्रम्ह’ असं आपण नेहमी म्हणतो, पण अन्न हे पूर्णब्रम्ह असल्याची जाणीव आपल्यासारख्या प्रौढांना होते, लहान मुलं मात्र या सर्व बाबींपासून अनभिज्ञ असतात. त्यामुळे त्यांचा आहार सर्वसमावेशक आणि जास्तीतजास्त पोषणमूल्य असावा याची काळजी पालकांनाच घ्यावी लागते. कधी कधी एखादा पदार्थ मुलांना खूप आवडतो, तर कधी कधी एखादा पदार्थ समोर आला की मुलं नाकं मुरडतात. अशावेळी मुलांना आवडणारा पदार्थ पोषणमूल्य असणारा आहे का याची काळजी घ्यावी लागते किंवा मुलांना न आवडणारा पदार्थ कदाचित मुलांच्या शारीरिक वाढीसाठी उपयुक्त ठरणारा असेल तर तो पदार्थ खाण्यासाठी मुलांची समजूत घालण्याची तारेवरची कसरत पालकांना करावी लागते.

आयुर्वेदानुसार आहाराच्या दृष्टीने प्रमुख तीन अवस्था समजल्या जातात. बाळ जन्मल्यापासून एक वर्षापर्यंत क्षीराद, एक ते तीन वर्षांपर्यंत क्षीरान्नाद आणि तीन वर्षांपासून अन्नाद या आहाराच्या प्रमुख तीन अवस्था असतात. तीन ते सहा वर्षाच्या वयात मुलं षडरसयुक्त संपूर्ण आहार घेऊ शकतात. तीन ते सहा वर्ष वय असणाऱ्या मुलांना सकाळच्या जेवणात ऋतुमानानुसार पालेभाज्या, कडधान्याच्या उसळी, पोळी, कोशिंबिर, ताक अशा आहाराची सवय मुलांने लावणं गरजेचं आहे. तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांच्या आवडीनिवडी पुरेशा प्रमाणात निर्माण झालेल्या नसतात किंबहुना याच वयात त्याच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी विकसित होत असतात, त्यामुळे मुलांना योग्य तो आहार घेण्याची सवय लावणं याच वयात गरजेचं आणि सोप्पही असतं.

मुलांना दुपारच्या जेवणात ऋतुनुसार फळे, साजूक तुपातले, डिंकाचे, मुगाचे अथवा राजगिऱ्याचे लाडू, मनुके, अंजीर, बदाम, काजू इत्यादी ड्रायफ्रूटचा वापर असणारे पदार्थ किंवा साळीलाह्यांचा, कुरमुऱ्यांचा किंवा शेंगदाण्याचा चिवडा द्यावा.

रात्रीचं जेवण मात्र पचायला हलकं असेल याकडे लक्ष द्यावं, वेगवेगळे पराठे, घिरडे, तांदूळ किंवा मुगाची खिचडी, भाज्या किसून आणि वाफवून बनवलेली कोशिंबिर, उकडलेली अंडी आणि पोळी इत्यादींचा रात्रीच्या जेवणात समावेश असावा. तीन ते सहा वर्ष हा मुलांच्या बौद्धिक आणि मानसिक विकासाचा काळ असल्याने दूध, दुधाच्या पदार्थांचाही जेवणात योग्य प्रमाणात समावेश असावा. मुलांना जास्तीत जास्त गायीचं दूध देण्याकडे भर असावा. या वयात मैद्याच्या पदार्थांसह मसालेदार पदार्थ मुलांना खाण्यास देण्यास शक्यतो टाळावं. पाव, ब्रेड, केक, यांच्या अति सेवनामुळे बद्धकोष्टतेचा धोका संभवत असल्याने आणि आतड्यांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याने अशा पदार्थांचा वापर कमीत कमी करावा. चॉकलेट, शीतपेयांचंही सेवन प्रमाणात असावं.

हल्ली एज्युकेशनचा जमाना असल्याने आणि प्लेग्रुप नर्सरी, केजीच्या जमान्यात मुलांना वयाच्या तिसऱ्या वर्षांपासूनच शाळेत जावं लागतं. त्यामुळे त्यांचा जेवणाचा डबाही शारीरिक आणि मानसिक वाढीच्या दृष्टीने परिपूर्ण असावा. मुलांना बाहेरचे पदार्थ खाण्यास देण्यापेक्षा घरच्याघरी नवनवीन पदार्थ बनवून देता येऊ शकतात. मेथी किंवा कोबीचे पराठे, भाजणीचे, कांद्याचे पराठे, निरनिराळे सँडविच, तसेच मोड आलेल्या धान्याचे घिरडे मुलांच्या डब्यात दिल्यास मुलं सॉससोबत आवडीने खातात. बटाटा पोहा कटलेट, वाटाणा कटलेट तसेच विविध भाज्यांपासून बनवलेले कटलेट मुलांच्या डब्यात द्यावे. वाटलेल्या डाळीच्या पुऱ्या, लाल भोपळ्याच्या गोड किंवा तिखट पुऱ्या, नारळाची बर्फी, विविध प्रकारच्या चिक्की, डाळीचे तसेच रव्याचे लाडू, इडली, डोसा इत्यादी पदार्थ मुलांच्या डब्याला आलटून पालटून द्यावेत. मुलांच्या डब्यात पदार्थ देताना त्यात विविधता असेल याची काळजी घेतली तर मुलंही आवडीनं खातात आणि अनेक पौष्टिक घटक मुलांना मिळतात. परिणामी मुलांवर टॉनिक, व्हिटामिनच्या औषधांचा होणारा भडीमार टाळता येऊ शकतो.


डॉ. किर्ती ढोबळे, मानसरोवर, नवी मुंबई
dr.kirtidhobale@gmail.com



सपंर्क- 9222360448