रविवार, ७ ऑगस्ट, २०११

आला पावसाळा....आरोग्य सांभाळा..!





पहिला पाऊस मातीचा स्वर्गीय सुगंध देतो....उकाड्याने व्याकूळ झालेल्या जीवाला आल्हाददायक गारवा देतो. निसर्गाच्या नाना कला दाखवतो. डोंगर, दऱ्या, शेत-शिवाराला हिरवी झालर चढवतो पण चिंब कोसळून रान आबादानी करणारा पाऊस आपलं आरोग्यही आबादानी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात वातावरण साधारणपणे आणि तुलनेने थंड असल्याने तसेच वातावरणात एकप्रकारचा ओलावा असल्याने योग्य काळजी न घेतल्यास आरोग्याच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. त्यातच कामाधामानिमित्ताने घराबाहेर पडणाऱ्यांना कित्येकदा पावसात भिजावं लागतं आणि त्यातच पावसाळ्यात अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचून दुर्गंधी निर्माण झालेली असते. रस्त्यांवरील खड्य़ांत, घराच्या छतावर, गॅलरीतल्या झाडांच्या कुंड्यांमध्ये, अंगणातल्या सखल भागात पाणी साचून राहिल्याने त्या पाण्यावर डासांचं राज्य निर्माण होतं. डासांचा प्रादुर्भाव वाढल्यानं मलेरिया, डेंग्यू, टायफॉईड, काविळीसारख्या आजारांना आयतं आमंत्रण मिळतं. त्यामुळे खासकरून पावसाळ्यात आरोग्याची जास्त काळजी घेणं क्रमप्राप्त ठरतं.

आयुर्वेदात ऋतुचर्येचे आदानकाळ आणि विसर्गकाळ अशा दोन भागांत विभाजन केले आहे. आदानकाळातील शिशिर, वसंत, ग्रीष्म या ऋतुत मनुष्यबळ उत्तरोत्तर तुलनेने क्षीण होत जाते. याच आदानकाळानंतर वर्षा ऋतूचे आगमन होते. त्यामुळे आधीच क्षीण झालेलं शरीर आणि मंदाग्नी यावर पावसाळ्यातील थंड हवेचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते. परिणामी वातदोष, पित्तदोष तोंड वर काढण्याची दाट शक्यता असते. त्याचप्रमाणे अतिसार, प्रवाहिका, ग्रहणी, आम्लपित्त, अपचन, अरुची तसेच उदरशूल यांसारखे पचनसंस्थेचे आजार आणि दमा, सर्दी, खोकल्यासारखे श्वसनविकार जडण्याची भीती असते. हातापायांना चिखली, नायटा तसेच विविध बुरशीजन्य त्वचाविकारही जडण्याची शक्यता पावसाळ्यात जास्त असते.

वातदोष असणाऱ्यांनी थंड हवेपासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा. रात्री झोपताना तेलाने सांध्यांचं मालिश करावं. त्रासदायक व्यायाम तसेच सांध्यांवर ताण आणणारे योग टाळावेत.

पित्तदोष असणाऱ्यांनी पचायला हलकं जेवण घ्यावं. तसेच रात्री झोपताना दूध प्यावं. कमी मीठ असलेले आणि कमी तिखट पदार्थ खावेत. पित्तदोष असणाऱ्यांनी जागरण टाळावं. वेळी-अवेळी खाणं टाळावं. शिळं अन्न खाणंही टाळावं. शीतपेय, जंक फूड टाळावं. लिंबूपाणी, नारळपाणी वरचेवर घ्यावं.

त्वचाविकार होऊ नये म्हणून पावसाळ्यात भिजलेलं अंग त्वरित कोरडं करून घ्यावं, बाहेर पडताना पाय भिजू नयेत असे बूट घालावेत. चुकून बुटात पाणी शिरलंच तर त्वरित ते कोरडे करून मगच घालावेत. रात्री झोपताना खोबऱ्याचं तेल हातांना तसेच पायांना लावावं. ओले कपडे जास्तवेळ अंगावर ठेऊ नयेत.

अतिसार किंवा हगवण लागण्याचीही शक्यता पावसाळ्यात जास्त असते. अशावेळी दूध न घातलेल्या एक कप कोऱ्या चहात अर्ध लिंबू पिळून प्यावं. तासाभरात फरक पडतो. त्याचप्रमाणे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊ नये म्हणून मीठ-साखर-पाण्याचं मिश्रण दिवसातून शक्य तितक्या वेळा घ्यावं. अर्धा चमचा सुंठ मधासोबत घेतल्यास पोटाच्या तक्रारी दूर राहतील. कडूनिंबाची पाने वाटून त्यात गिलोय चूर्ण आणि आवळा चूर्ण मिसळा. या तीन्हींचा ताजा रस काढून सेवन करा. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

सर्दी झाल्यास 2 कप पाण्यात तुळशीची 10 ते 12 पाने, थोडे आले, गुळ टाकून उकळून घ्यावं आणि गाळून घेऊन दिवसातून किमान दोनवेळा घ्यावं. तसेच मूठभर चिरलेला कोबी आणि वाटलेला कापूर उकळत्या पाण्यात टाकावा आणि नाक व तोंड उघडून वाफ घ्यावी. दिवसातून दोन ते तीन वेळा वाफ घेतळ्यानं सर्दी कमी होण्यास मदत होते. कधीकधी सर्दी वाढल्याने कफ वाढून तो छातीत जाऊन साचतो. अशावेळी सूंठ किंवा वाळूची पुरचुंडी करून ती तव्यावर गरम करावी आणि छातीवर 5 ते 10 मिनीटं शेक द्यावा. त्यामुळे छातीत साचलेला कफ वितळण्यास मदत होते. सर्दी झाली असल्यास केळी, दही, ताक सेवन कमी करावं.

खोकला येत असल्यास चमचाभर आल्याचा रस तेवढ्याच मधात टाकून चाटण करावं. तसेच तुळशीच्या पानांचा आणि लवंग यांची काढा करून घ्यावा. तेलकट, थंड पदार्थ टाळावेत. तसेच रात्री झोपताना हळद टाकून गरम केलेलं दूध घ्यावं. लहान मुलांना खोकला येत असल्यास दुधात सूंठपूड, मिरे आणि हळद घालून द्यावं.


ताप आल्यास त्रिभूवन कीर्तीरस, अमृतारिष्ठ या आयुर्वेदिक औषधांचा वापर करावा. पचायला जड अन्न टाळावं. मुगाची खिचडी, तांदळाची पेज, डाळ-भातासारखे हलके पदार्थ खावेत. ताप असलेल्या काळात दुधाचं सेवन शक्यतो टाळावं. त्याचप्रमाणे तेलकट, तिखट पदार्थ तसेच मांसाहार पूर्ण वर्ज्य करावा. मिठाच्या पाण्यात कापड भिजवून अंग पुसून काढावं. मिठाच्या पाण्याने भिजवलेला रुमाल डोक्यावर ठेवावा. त्याचप्रमाणे डोक्याला हळद आणि चंदनाचा लेप द्यावा. दिवसभरात ताप न उतरल्यास तज्ज्ञ डॉक्टरला दाखवावं.


पावसाळ्यात नेहमी उकळलेलं पाणी प्यावं. घराच्या परिसरात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. घराच्या परिसरातील आणि घरातल्या कचऱ्याची वेळेत विल्हेवाट लावावी. त्याचप्रमाणे घरात भांड्यातल्या पाण्याचा साठा जास्त दिवस ठेऊ नये. डास घरात येऊ नयेत म्हणून खिडक्यांना जाळी लावून घ्यावी. रात्री उघडं झोपू नये. अंगावर घेऊनच झोपावं. घरातलं वातावरण उबदार ठेवण्याचा प्रयत्न करावा. मुळात पावसाळ्याचे दिवस हे सणवाराचे आणि वृतवैकल्याचे असल्याने खाण्याबाबत खूपवेळा बदल संभवत असल्याने विशेष काळजी घेण्याची गरज आहे. सणासुदीला चटकदार आणि मसालेदार पदार्थ कमी खावेत. त्याचप्रमाणे उपवासादिवशी साबुदाणा खिचडी, साबुदाण्याचे पदार्थ तसेच बटाट्याचे पदार्थ पचायला जड असल्याने असे पदार्थ कमी प्रमाणात खावेत. उपवासादिवशी भगर, राजगिऱ्याचे लाडू, गूळ-शेंगदाणे, खजूर त्याचप्रमाणे विविध प्रकारची फळे खावीत. अशाप्रकारे पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेतली तर हवाहवासा वाटणारा पावसाळा आपण मस्त एन्जॉय करू शकतो.


डॉ. कीर्ती ढोबळे,
मानसरोवर, नवी मुंबई.
Dr.kirtidhobale@gmail.com
9222360448

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा