शनिवार, २४ सप्टेंबर, २०११

काविळ आणि घरगुती उपाय

काविळ झाली आहे त्याला सर्वच पिवळं दिसतं असं आपण अनेकांना उपहासाने म्हणतो. मात्र या उक्तीचा काहिसा संबंध काविळ या आजारातील लक्षणांमध्ये दडलेला आहे. काविळीला कामला या नावानेही ओळखले जाते. मूळ संस्कृत कामला शब्दाचा अर्थ सर्व इच्छा नाहिसा करणारा आजार असा आहे. पावसाळा सुरू झाल्यावर किंवा पावसाळा संपल्यानंतर काविळीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होते. काविळ आणि काविळीवरील उपचारांबाबत अनेक समज-गैरसमज असले तरी दूषित पाण्यामुळे तसेच दूषित अन्न सेवनामुळे काविळ होते. काविळ होऊ नये याबाबत प्रतिबंधात्मक उपाय, आहार-विहाराबाबत तसेच काविळ झाल्यानंतर करावयाच्या उपचाराबाबत आयुर्वेदात खूप सोपे आणि चांगले उपाय सांगितले आहेत.


मुळात यकृतातील पेशींना इजा झाल्यानं त्यांना सूज येते आणि यकृताच्या कार्यात अडचणी निर्माण होतात. परिणामी रक्तातील

पित्तयुक्त द्रव्याचे प्रमाण वाढते. हे वाढलेलं पित्तयुक्त द्रव्य डोळ्यांतील बुबुळ वगळता असलेला पाढंरा भाग, त्वचा तसेच हातापायाची नखे अशा भागांतं साचून राहतं. त्यामुळे शरीराला एकप्रकारचा पिवळेपणा येतो. मूत्राद्वारेही या पित्तयुक्त द्रव्याचा निच

रा होत असल्याने लघवी पिवळी होते. पित्तयुक्त द्रव्याचं प्रमाण जास्त प्रमाणात असेल तर लघवीला कित्येकदा लालसर रंग येतो. यकृताच्या कार्यात बिघाड झाल्यानं तसेच रक्त आणि मूत्रात पित्तजन्य पेशींचं प्रमाण वाढल्यानं पचनाच्या तक्रारींत वाढ होते. लाल रक्तपेशींचा वेगाने नाश होऊन बिलिरुबीन वाढणं (लहान बाळांना जन्मत: होणारी कावीळ). पित्तमार्गातील अडथळ्यामुळे यकृतात

पित्त साठून ते रक्तात उतरणं म्हणजेच काविळ होय.

काविळ झाल्यावर अन्न पचनाच्या तक्रारी वाढल्यानं कित्येकदा व्यक्तीला उलट्या होतात आणि परिणामी अशक्तपणा वाढतो. त्यामुळे चक्कर येण्याचे प्रमाणही वाढण्याची शक्यता असते. हातापायाचे गोळे दुखण्याच्या तक्रारी उद्भवतात. काविळ झालेल्या व्यक्तीला सारखं झोपावसं वाटतं. चेहरा आणि संपूर्ण शरीर निस्तेज होतं. भूक मदावते आणि अन्न पाण्यावरची इच्छा नाहिसी होते. सतत ताप येणं, डोकेदुखी, अंगदुखी, भूक नसणं, मळमळणं ही अगदी प्राथमिक लक्षणं आहेत. पोटाच्या वर उजव्या बाजूला वारंवार दुखतं. रक्त तपासणीत काविळीचा समजतो. पॅथॉलॉजी लॅबमध्ये लघवीची तपासणी केली असता काविळीचं निदान होतं. काविळी झाली आहे की नाही याचं निदान घरगुती पद्धतीनेही करता येतं. छोट्या बाटलीत साठवलेल्या लघवीत कापूर बुडवल्यास कापराला पिवळसर रंग चढल्यास त्वरीत डॉक्टरांना दाखवून योग्य त्या तपासण्या करून घ्याव्यात.

योग्य तपासण्यानंतर काविळ झाली असल्याचं निदान झाल्यास काविळग्रस्त व्यक्तीनं आहार-विहारात महत्त्वाचे बदल करणं खूप

गरजेचं असतं. कारण काविळ हा आजार बरा होण्यासाठी जशी औषधोपचारांची गरज असते तशीच पथ्यपालनाचीही नितांत गरज असते. काविळ झालेल्या रुग्णाची सुमारे पंधरा दिवस ते महिनाभर काळजी घेणं गरजेचं असतं. सुमारे महिनाभर पूर्ण आराम करावा, मात्र जास्त झोपू नये. उन्हात फिरणं टाळावं. काविळ झालेल्या व्यक्तीनं काजू, बदाम, खोबरे, तळलेले तसेच मसालेदार तिखट पदार्थ त्याचप्रमाणे पचायला जड पदार्थ वर्ज्य करावेत. उघड्यावरचं अन्न खाणंही कटाक्षानं टाळावं. दूध आणि दुधाचे पदार्थ तसेच मांसाहार पूर्णत: वर्ज्य करावा. पोट साफ होण्यासाठी त्रिफळा चूर्णासारखे उपाय करावेत. मद्यपान तसेच तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन पूर्णत: टाळावं. पाणी उकळून थंड करूनच प्यावं.

काविळ झालेल्या लहान मुलांना काळ्या मनुक्याचं पाणी आणि प्रौढ व्यक्तींना पाण्यात भिजवलेले काळे मनुके खाण्यास द्यावेत. लाह्या, उकडलेल्या ताज्या भाज्या, तांदूळ किंवा ज्वारीची भाकरी, मुगाची आमटी तसेच पालक-टोमॅटो-दुधी-कोबीचं कोमठ सूप, भाताची पेज, मध्यम पिकलेल्या केळी यासारखे पदार्थ द्यावेत. त्याचप्रमाणे ऊस चाऊन खावा. गोड आणि ताजे ताक दिवसातून किमान दोन वेळा प्यावं. गूळ पाण्यात उकळून गाळून त्याचा काढाही दिवसातून एकदा घ्यावा.

काविळ झाल्यानंतर कित्येकदा होणारा त्रास वाढल्यास आणि किंवा उलट्यांमुळे अति अशक्तपणा आला असल्यास तसेच सारखा ताप येत असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि आवश्यक असल्यास रुग्णालयात दाखल होऊन पुढील उपचार घ्यावेत.

डॉ. कीर्ती प्रवीण ढोबळे, नवी मुबंई

संपर्क- 8655185968

गुरुवार, १ सप्टेंबर, २०११

ऐन तारुण्यात सामना मुरूमांशी







स्वच्छंदपणे बागडत विश्वाला कवेत घेऊ पाहणारं तारुण्य सर्वांनाच हवं असतं. प्रत्येकजण आयुष्यातील सर्वात सुवर्णकाळ म्हणून तारुण्याकडे पाहात असतो. मात्र याच आत्मविश्वासानं ओसंडून वाहणाऱ्या गुलाबी तारुण्याच्या समुद्राला काही समस्यांचा नावडता किनारा लाभलेला असतो. ऐन तारुण्यात सामना करावा लागणाऱ्या नावडत्या गोष्टींपैकी एक म्हणजे तारुण्यपीटिका…अर्थात मुरूमं. यालाच इंग्रजीमध्ये पिंपल्स असं म्हणतात. कोणत्याही वयातील प्रत्येक व्यक्तीला आपण सुंदर दिसावं अशी इच्छा असते. तारुण्यात तर ही इच्छा प्रबळ होतेच. मात्र याच तारुण्यात नैसर्गिकरित्या मिळालेल्या आत्मविश्वासाला काहीसा धक्का लावण्याचा प्रयत्न तारुण्यपीटिका करतात. मात्र काही पथ्य पाळली, आहारात थोडे बदल केले किंवा चेहऱ्याची योग्य काळजी घेतली तर तारुण्यपीटिकांवर मात करता येऊ शकते.

किशोर वयातून तारुण्यात पदार्पण करताना मुलं आणि मुलींच्या शरीरात महत्त्वाचे बदल होत असतात. मुख्यत: तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना यौनग्रंथी विशेषत्वाने सक्रीय होतात. यौन ग्रंथीतील अंतस्त्राव शरीराच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरतात. मात्र या अंतस्त्रावात अँण्ड्रोजनची पातळी वाढल्यावर मुरूमं येतात. तसेच मासिक पाळी येण्यापूर्वी मुलींच्या शरीरात प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढते त्यामुळे चेहऱ्यावर गालांवर, नाकांवर, कपाळावर तसेच खांदे, पाठीवर किंवा छातीवर मुरूमं येतात. ठराविक वयात शरीरात होणारे बदल आपण टाळू शकत नाही मात्र आपल्या आहार-विहारात काही बदल केल्यास आपण मुरुमांच्या त्रासाची तीव्रता कमी करू शकतो. कित्येकदा अयोग्य आणि अवेळी आहार मुरूमांना आमंत्रण ठरतो. मुरूमांचा त्रास असणाऱ्यांनी शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ टाळणं गरजेचं असतं. बदाम, आक्रोड तसेच मांसाहारासारखे गरम प्रकृतीचे पदार्थ टाळणंही आवश्यक असतं.

मुरुमांचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना तेलकट आणि हाय कॅलरी असणाऱ्या पदार्थाचं सेवन कमी करावं. बटाटा, पिझ्झा, बर्गर तसेच चॉकलेट, शीतपेयं खाणं शक्यतो टाळावं. शरीरात आयोडीन प्रमाणापेक्षा जास्त झालं तरीही मुरूमं येतात. अतितिखट किंवा अतिगोड, आंबवलेले पदार्थ तसेच कोबी, फ्लॉवर, गवार, ढोबळी मिरची, वांगे, टोमॅटो, चिंच, कैरी, दही, बेसनाचे पदार्थ, अननस वर्ज्य करावे. अर्धवट झोप किंवा मानसिक ताणतणावही मुरुमं वाढवण्यास मदत करतात त्यामुळे पुरेशी झोप घेणं आणि मानसिक तणावातून मुक्ती मिळवणं गरजेचं असतं. धूम्रपान, तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन आरोग्याला जसं अपायकारक आहे तसच मुरुमं वाढण्यासही कारणीभूत ठरतं. घामामुळं चेहरा तेलकट होऊन त्वचेवरची सूक्ष्म छिद्र बंद होतात आणि त्यामुळे पी अँक्ने नावाचा बॅक्टेरिया वाढून चेहऱ्यावर लाल पुटकुळ्या येतात. डोक्यात कोंडा झाल्यानंही मुरुमं येतात. कित्येकदा अनुवंशिकतेतूनही मुरूमं येऊ शकतात. स्त्रियांच्या मासिक पाळीत अनियमता आल्यास किंवा मासिक पाळीबाबत काही समस्या उद्भवल्यासही मुरूमांचं प्रमाण वाढतं. त्यामुळे अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं क्रमप्राप्त ठरतं. पचनासंदर्भातले गॅस, अँसिडिटीसारख्या पोटाच्या समस्या तसेच मलमूत्र विसर्गाच्या समस्याही मुरुमांना आमंत्रण ठरतात.

मुरुमांचा त्रास असणाऱ्यांनी आहारात फळं, पालेभाज्यांचा समावेश करावा. कपाळावर मुरूमं येत असल्यास केसांना तेल लावणं शक्यतो टाळावं. चेहरा दिवसातून दोन ते तीन वेळा कोमठ पाण्याने धुवून कोरड्या टॉवेलने पुसावा. चेहरा जास्तीत जास्त कोरडा राहील याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे जेवणानंतर भरपूर पाणी प्यावं. रक्तचंदन, कडूलिंबाची पानं, तुळशीची पानं मसूरडाळ यांचे समप्रमाणात मिश्रण वाटून त्याची पेस्ट करावी आणि सकाळी अंघोळीअगोदर चेहऱ्याला लावावी. चेहऱ्यावरील पेस्ट सुकल्यानंतर कोमठ पाण्यानं धुवून काढावी. तसेच डाळींब आणि संत्र्याचा सालीला थोड्या हळदीबरोबर वाटून त्यात पिकलेल्या लिंबाचा रस मिसळून मुरूमांवर लावावा. त्यामुळे् मुरूमं कमी तर होतातच पण फुटलेल्या मुरुमांमुळे चेहऱ्यावर उठलेले काळे डागही कमी होण्यास मदत होते. जायफळ तसेच रक्तचंदन उगळून चेहऱ्यावर लावल्यानेही मुरुमांचं प्रमाण कमी होतं.

मुरुमांचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी पुरेसा व्यायाम करावा. अपचनाचे त्रास होवू नयेत याची काळजी घ्यावी. चेहऱ्यावर आलेल्या मुरुमांना वारंवार हात लावू नयेत तसेच मुरुमं फोडण्याचा प्रयत्नही करू नये. मुरूमं पिकल्यावर आपोआप फुटतात. मुरूमं फुटल्यावर लगेच स्वच्छ पाण्यानं चेहरा धुवावा. त्याचप्रमाणे साबणाचा वापर टाळावा. उन्हात फिरणं शक्यतो टाळावं किंवा उन्हात फिरण्यामुळं तसेच उकाड्यामुळे चेहऱ्यावर आलेला घाम त्वरित पुसून घ्यावा. रासायनिक औषधं किंवा रासायनिक गूण असणारे वेगवेगळे मलम लावण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डॉ. कीर्ती प्रवीण ढोबळे, नवी मुंबई