रविवार, २२ एप्रिल, २०१२

उन्हाळा आणि आरोग्य


थंडीत कुडकुडायला लावणाऱ्या आणि सर्वांनात हवाहवासा वाटणाऱ्या हिवाळ्याच्या गर्भातून उन्हाळ्याचा जन्म होतो आणि हिवाळ्यात अनुभव घेतलेल्या थंडगार वातावरणाचे जणू उट्टे फेडण्याचं काम उन्हाळा करतो. थंडगार वातावरणाचा आल्हाददायकपणा देणारा हिवाळा संपतो न् संपतो तोच नकोशा वाटणाऱ्या उन्हाळ्यातली रखरखीत उन्हाची काहिली अंगावर येते. उन्हाळा सुरू झाल्याची वर्दी येते आणि सूर्य अक्षरश: आगीचे गोळे फेकू लागतो. सर्वसाधारणपणे मार्च महिन्याच्या मध्यानंतरच उन्हाळ्याचे चटके जाणवू लागतात. उन्हाळा मनाला जसा त्रासदायक वाटतो तसाच आरोग्याच्या दृष्टीकोनातूनही उन्हाळा त्रासदायक ठरू शकतो. उन्हाळा येतानाच मुळी आरोग्याच्या अनेक समस्या आणि विविध आजारांच्या हातात हात घालून येतो. त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्य सांभाळणे तितकेच आवश्यक आहे. आयुर्वेदानुसार उन्हाळा अर्थात ग्रीष्म हा आदानकाळातील सर्वात बलहानी करणारा ऋतू आहे. उन्हाळ्यात सूर्यकिरणे लंबरुप झाल्याने पृथ्वीची उष्णता वाढते. उष्मा वाढल्याने जलीय अंशाचे शोषण होते. पर्यायाने सर्व शरीर धातू क्षीण होतात. यामुळे शरीर श्रान्त (थकलेले) तसेच बलान्त (बलहीन) होते. त्यामुळे अल्पश्रमानेही थकवा जाणवतो. तसेच उन्हाळ्याच्या काळात शरीरातून घामावाटे जीवनावश्यक सोडियम पोटॅशियम, पाणी बाहेर टाकलं जातं आणि जीवनघटकांचा नाश होतो. यामुळे बलक्षय होऊन क्षयरोग, गोवर, कांजण्या, नागिणसारखे विकार होण्याचा धोका निर्माण होतो. विशेषत: शरीरातील जलद्रव्यांचा नाश झाल्याने उष्माघाताचाही धोका संभवतो. 


उन्हाळ्याच शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने सर्वांगाचा दाह होणे, अतिसार, लघवीला जळजळ होणं, उलटी तसेच डोकेदुखीसारखे त्रास होतात. सतत घाम येण्यामुळे शरीराला दुर्गंधी तसेच विविध त्वचारोग होण्याची शक्यता असते. अंगावर घामोळ्या तसेच फोड्या येतात. कडक उन्हात जास्तकाळ काम केल्याने तसेच कडक उन्हात फिरण्याने शरीरात उष्णता वाढते आणि चेहरा तसेच अंगावरची त्वचा लाल किंवा काळसर होते. उष्माघात झाल्यास व्यक्ती मुर्छित होण्याची शक्यता असते. उन्हाळ्याच्या दिवसांत निर्माण होणाऱ्या व्याधी आणि त्यावरचे प्रथमोपचार यावर आपण मिमांसा करू. 

सर्वांगदाह- या व्याधीत संपूर्ण शरीराची आग होते. आणि चेहरा तसेच त्वचा निस्तेज होते. उत्साह कमी होतो. सर्वांगदाहाचा त्रास होत असलेल्या व्यक्तीला जास्तीत जास्त थंड वातावरणात ठेवावं. एसी तसेच फॅन खाली ठेवावं. उन्हात जास्तकाळ फिरू नये. शरीर वरचेवर थंड पाण्याने पुसून घ्यावं.

उष्माघात- शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने तसेच शरीरातील पाण्याच्या प्रमाणाचा समतोल बिघडल्याने व्यक्तीला ग्लानी तसेच चक्कर येते. डोळ्यासमोर अंधाऱ्या येतात. अशावेळी रुग्णाला थंड वातावरणात शांत झोपवावं. शरीर थंड पाण्यावे पुसून घ्यावं. डोक्यावर बर्फाची पिशवी ठेवावी. उष्माघाताचा त्रास होत असलेल्या रुग्णाला जास्तीतजास्त द्रव आहार द्यावा. अशा रुग्णांनी कडक उन्हाच्या वेळी घरातून बाहेर पडू नये. तसेच उष्माघात होत असलेल्या रुग्णाला घरात एकटे सोडू नये.
उष्माघाताची लक्षणे
* ताप येतो
*
डोके दुखणे
*
डोळ्यांची आग
*
तहान लागते

घरगुती उपाय
* थंड पाण्याचा वापर
*
कांद्याचा रस तळपायाला लावणे
*
लिंबू-पाणी अधिकाधिक पिणे
*
उन्हात घराबाहेर पडू नये

उष्माघात टाळण्यासाठी...
* डोक्‍यास पांढरा रुमाल बांधूनच बाहेर पडा
*
उन्हातून आल्यावर फ्रीजचे पाणी पिऊ नका
*
ताप असल्यास डॉक्‍टरांच्या सल्ल्याने औषध घ्या 
*
टरबूज, कांदा, डांगर यांचा जास्त वापर करा


मुत्राघात- या व्याधीत लघवीला जळजळ होण्याचा त्रास होतो. शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे लघवीत उष्णता निर्माण होते. आणि लघवीच्या जागेत दाह होतो. मुत्राघाताचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी दिवसातून तीन ते चार वेळा लिंबू सरबत अवश्य प्यावं. तसेच नारळपाणी, कोकम सरबतही वरचेवर घ्यावं. एक चमचा जिरं-एक चमचा धने ग्लासभर पाण्यात रात्री भिजत घालून सकाळी हे मिश्रण गाळून घ्यावं आणि त्यात चमचाभर खडीसाखर टाकून प्यावं.

उलट्या-जुलाब- उन्हाळ्याच्या दिवसांत शरीरात पाण्याचं प्रमाण कमी झाल्यानं मळमळण्याचा त्रास होण्याची शक्यता असते. तसेच अतिसाराचाही त्रास होण्याची भीती असते. अशावेळी जास्तीतजास्त द्रवपदार्थ सेवन करावेत. त्याचप्रमाणे एक ग्लास पाण्यात दोन चमचे साखर आणि चिमूटभर मीठ टाकून दिवसातून चार ते पाच वेळा प्यावं. जुलाब होत असतील तर कपभर कोऱ्या चहात अर्ध लिंबू पिळून प्यावं.

त्वचाविकार- उन्हाळ्यातील सूर्याच्या लंबरूप किरणांमुळे त्वचेवर विपरित परिणाम होतात. त्वचा काळसर होते. त्यामुळे घराबाहेर पडताना तोंडाला रुमाल तसेच अंग झाकून ठेवावं. कपडे सैल असतील याची काळजी घ्यावी. बाहेर पडताना आयुर्वेदिक सनस्कीन लोशन लावावं. उष्णतेने शरीरातील रंगद्रव्यावर परिणाम होतो त्यामुळे त्वचा काळवंडते आणि चेहऱ्यावर वांग येतात. त्वचा कोरडी व निस्तेज होते. डोळ्यांना उन्हाच्या झळा लागून डोळ्यांवरही विपरित परिणाम होतात. म्हणून बाहेर पडताना डोळ्यांवर गॉगल लावावा तसेच सनकोट वापरावा. सुती, मुलायम तसेच सौम्य रंगाची अर्था पांढऱ्या रंगाची कपडे वापरावी. पायात घट्ट बूट वापरणे टाळावे. त्वचा कोरडी पडू नये म्हणून उन्हाळ्यात जास्तीतजास्त पाणी प्यावं. तसेच फळांचं जास्तीतजास्त सेवन करावं. नारळपाणी, विविध प्रकारच्या फळांचे रस तसेच आहारात काकडीचं प्रमाण वाढवावं. रात्री झोपताना संपूर्ण शरीराला थंड खोबऱ्याच्या तेलाने मालिश करावी. गोवर, कांजण्या आल्या असतील तर त्वरीत तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवावं.
 
उन्हाळ्यातील आहार- उन्हाळ्यात पचायला हलका व लघु आहार घ्यावा. उन्हाळ्यात वात व पित्तदोषाची वृद्धी होत असते त्यामुळे या काळात वातुळ, पचायला जड, तिखट तसेच जास्त गरम आहार टाळावा. मुगाची खिचडी किंवा वरण तसेच सर्व पालेभाज्यांचं प्रमाण आहारात वाढवावं. टरबूज, खरबूज, संत्री, मोसंबी, केळी, सिताफळ, काकडी, द्राक्षे इत्यादी फळांचं सेवन वाढवावं. तसेच थंड तुपाचाही आहारात समावेश करावा. उन्हाळ्याच्या दिवसांत जास्तीत जास्त द्रवाहार करावा. नारळपाणी, उसाचा रस, कोकम सरबत, नीरा तसेच फळांचा ताजा रस घ्यावा. जेवणानंतर ताकही अवश्य प्यावं. उन्हाळ्याच्या दिवसांत मांसाहार शक्यतो टाळावा. फ्रीजमधलं अतिथंड पाणी पिण्यापेक्षा मटक्यातील सौम्य थंड पाणी प्यावं. लोणी, श्रीखंड, मावा, दही, पनीर, लस्सी शक्यतो टाळावं. मद्यसेवन पूर्ण वर्ज्य करावं.

उन्हाळ्याच्या दिवसांत सकाळी तसेच सायंकाळी बागेमध्ये गवतावर अनवाणी चालावं. रात्री झोपताना काश्याच्या वाटीने तळपाय चोळावेत. अंघोळीसाठी तसेच वापरासाठी थंड पाणी वापरावे. उन्हाळ्यात शक्य झाल्यास दिवसा थोडी झोप घ्यावी. तयामुळे शारीरिक तसेत मानसिक समाधान मिळतं.

डॉ. कीर्ती ढोबळे
मानसरोवर, नवी मुंबई


   



  

   







रविवार, ४ मार्च, २०१२

डोळे हे जुलमी...काळजी आणि आहार

निसर्गानं माणसाला जे काही दिलंय ते भरभरून दिलंय. पण दातृत्वाची ओंजळ सदैव रिती करणारा निसर्ग आणि त्याच्या नाना कळा पाहायच्या असतील तर डोळे हवेतच, पण निसर्गाचं सर्वांगसुंदर रुप पाहण्यासाठी आवश्यक असणारे डोळेही दिलेत निसर्गानेच. नयनरम्य गोष्टींनी ओतप्रोत भरलेल्या निसर्गाचं याचि देही याचि डोळा दर्शन आपल्याला करून देण्यात डोळ्याची भूमिका फार महत्त्वाची आहे. सृष्टीला विविधांगी रंगछटांनी नखशिखांत तृप्त करून टाकणाऱ्या निसर्गाने माणसाला डोळेही किती विविधरंगी दिलेतपाहा ना..! घारे डोळे, काळेभोर डोळे, पिंगट डोळे, निळसर डोळे, भुरे डोळे, हिरवट डोळे, राखडी डोळे अशा एक ना अनेक प्रकारचे डोळे निसर्गाने माणसाला दिले आहेत. मानवी मनात चाललेल्या घडामोडींचे निदर्शक म्हणून डोळेच भूमिका पार पाडतात. मनात चाललेला भावनांचा हलकल्लोळ डोळेच व्यक्त करतात. शब्देविण संवादूचा महामंत्र सांगणाऱ्या ज्ञानोबा माऊलींनाही डोळ्यांच्या संवादाचीच महती सांगायची असावी असं वाटतं. समोरच्या व्यक्तीच्या मनातला राग, लोभ, द्वेष, मत्सर किंवा दया, माया, क्षमा आणि शांतीच्या भावना आपल्याला डोळ्यांमधूनच कळतात. आईच्या मातृत्वाची भावना, पित्याच्या पितृत्वाची जाणीवही आपल्याला शब्दांचा अर्थ न कळण्याच्या वयातच म्हणजे बालपणात त्यांच्या डोळ्यांमधूनच कळते. वासराला चाटणाऱ्या गाईच्या वात्सल्याचं दर्शनही आपल्याला गायीच्या पाणीदार डोळ्यांतून होतं. पिलाला घास भरवणाऱ्या चिमणीचं प्रेम तिच्या इवल्याशा लुकलुकणाऱ्या डोळ्यांतूनच दिसतं. डोळे ही मनाची खिडकी आहे. मानवी शरीरातील पाच इंद्रियांमध्ये डोळे या इंद्रियाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे नाजूकपणाची निसर्गदत्त देणगी लाभलेल्या डोळ्यांची निगा काळजीपूर्वक राखणं गरजेचं असतं. म्हणूनच डोळ्यांची काळजी आणि डोळ्यांचे आरोग्य यावर आज आपण उहापोह करणार आहोत.

डोळ्यांचे रक्षण

मुळात डोळ्यांची रचनाच अशी आहे की, त्यांचे संरक्षण आपोआपच होत असते. कपाळ, गाल आणि नाक यांच्यामध्ये असलेल्या खोबणीत डोळे अगदी सुरक्षित असतात. भुवयांवर असलेल्या केसांमुळे तसेच पापण्यांवर असणाऱ्या केसांमुळे डोळ्यांचे धुलिकण तसेच उन्हापासून संरक्षण करतात. तरीही

डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आणखीही काही गोष्टी करणं आवश्यक असतं.

उन्हात फिरताना तसेच पावसाळ्यात डोळ्यांची काळजी घेणं गरजेचं असतं. कडक उन्हात उष्णतेने डोळ्यांना त्रास होण्याची शक्यता असते. म्हणून डोळे स्वच्छ पाण्याने चार ते पाच तासांनी धुवायला हवेत. तसेच डोळे पुसण्यासाठी मऊ, मुलायम कापडाचा किंवा रुमालाचा वापर करावा. निर्जंतुक केलेल्या कापसाने डोळे पुसले तर उत्तमच. रात्री झोपताना डोळ्यांत स्वच्छ गुलाबपाणी टाकल्यास डोळ्यांना त्याचा फायदा होतो. तसेच गायीच्या तुपापासून बनवलेलं काजळही डोळ्यांना फायदेशीर ठरतं. हल्ली फॅशनच्या जगात डोळ्यांना लेन्स लावण्याचे प्रमाणही वाढले आहे. लेन्स लावताना तसेच काढताना हात स्वच्छ आणि निर्जंतुक केलेले असावेत. तसेच लेन्स रोजच्यारोज स्वच्छ कराव्यात. लेन्स स्वच्छ करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक ती औषधं वापरावीत. लेन्स लावल्यानंतर डोळ्यांतून पाणी येऊ नये याची काळजी घ्यावी. कांदा कापताना, रडू कोसळल्यावर तसेच झोपताना लेन्स काढून ठेवाव्यात. लेन्स लावल्यानंतर गरम वातावरण तसेच वाफेपासून दूर राहावं.

हल्ली कामाच्या निमित्तानं संगणकासमोर तासनतास बसावं लागतं. त्यामुळे डोळ्यांवर ताण पडतो. संगणकासमोर सतत बसावं लागणाऱ्या व्यक्तींनी तसेच सतत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी किमान दोन तासांनंतर डोळ्यांना आराम द्यावा. डोळे मिटून डोळ्यांवर थंड रुमाल ठेवावा. डोळे कोरडे पडले असतील तर डोळ्यात दोन ते तीन थेंब गुलाबपाणी टाकून 10 मिनीटं डोळे मिटून शांत पडावं. तसेच डोळे उघडताना एकदम न उघडता अलगद उघडावे. संगणकावर काम करताना संगणक आणि डोळ्यांमधलं अंतर किमान दोन फूट असावं. पुस्तक वाचतानाही पुस्तक आणि डोळ्यांमध्ये किमान दीड फूट अंतर असावं. टीव्ही पाहताना टीव्ही लांबूनच पाहावा. डोळ्यांना नंबरचा चष्मा असेल तर कोणतेही काम करताना चष्म्याचा वापर करावा अन्यथा नंहर वाढत जाऊन दृष्टीक्षमता कमी होण्याची भीती असते. प्रखर प्रकाशात, धुळीच्या ठिकाणी तसेच उन्हात जाताना किंवा दुचाकी चालवताना डोळ्यांना चांगल्या दर्जाचा गॉगल तसेच सनग्लास वापरावेत. दुसऱ्यांनी वापरलेला गॉगल किंवा सनग्लास वापरू नये.

रात्री झोपताना काश्याच्या वाटीने पायाला तेलाची मालिश केल्यास शांत झोप लागते आणि डोळ्यांना आराम मिळतो. तसेच डोक्याला मसाज केल्यानेही डोळ्यांना आराम मिळतो. आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेले अंजन रोज रात्री डोळ्यांना लावावे त्यामुळे खाज, डोळ्यांतून पाणी येणे, डोळे दुखणे अशा

त्रासापासून डोळ्यांचा बचाव करता येतो. तसेच एक चमचा त्रिफळादी धृत दिवसातून 2 वेळा घ्यावं. त्याचप्रमाणे एक चमचा त्रिफळादी चुर्ण रात्री झोपताना कोमठ पाण्यात टाकून घेतल्यास डोळ्याचे त्रास कमी होतात. || नासाही शिरसोव्दारम: | | या तत्वानुसार नाकातून एक ते दोन थेंब खोबऱ्याचे तेल सोडल्यानेही डोळ्यांना फायदा होतो.

डोळ्यांसाठी पोषक आहार

डोळे नेहमी निरोगी राहण्यासाठी तसेच डोळे शेवटपर्यंत कार्यक्षम राहण्यासाठी लहानपणापासूनच पोषक आहार गरजेचा असतो. पूरक तसेच पोषक आहार इतर अवयवांप्रमाणेच डोळ्यांनाही कार्यक्षम आणि निरोगी ठेऊ शकतो. रोजचा आहार सर्व बाजूंनी समतोल असावा. डोळ्यांच्या आरोग्यासाठी

जीवनसत्त्व तसेच प्रोटिनयुक्त पदार्थांची गरज असते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचं महत्त्व अनन्यसाधारण असतं. आहारात पालक, मेथी, शेवगा, गाजर, मुळा, टोमॅटो इत्यादी भाज्यांचा समावेश असावा. चवळी, मूग, मटकीसारखी कडधान्ये तसेच सफरचंद, पपई, आंबा केळी, पेरूसारखी

फळंही डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. शरीराला जीवनसत्त्व मिळावं म्हणून आहारात दूध, अंडी, मांस, मासे इत्यादींचाही समावेश असावा. मात्र शाकाहारी आहार शरीराला तसेत डोळ्यांना उपकारक असतो. पोट साफ राहावं म्हणून भरपूर पाणी प्यावं. आहारात सुकामेव्याचाही समावेश असावा. रोज सकाळी उपाशीपोटी दोन खजूर किंवा दोन खारीक किंवा दोन अंजीर दुधात भिजवून केलेलं सेवन डोळ्यांना फलदायी ठरतं. त्याचप्रमाणे सकाळी मूठभर काळे मनुके चावून खावेत. शेंगदाणा आणि गुळ तसेच राजगिऱ्याचे लाडूही वरचेवर खावेत.

डोळ्याच्या आजारांचा संसर्ग आणि काळजी

हल्ली प्रदूषणाच्या प्रमाणात वाढ झाल्याने डोळे येण्याचं प्रमाण वाढत चाललय. डोळे येणं हा आजार मुळात संसर्गजन्य असल्याने खास काळजी घेणं

गरजेचं असतं. डोळे आलेल्या व्यक्तीने वापरलेले काजळ, सुरमा तसेच सुरमा लावायची काडी, टॉवेल, रुमाल इत्यादी वस्तू दुसऱ्या व्यक्तींनी वापरल्यास त्यांनाही डोळे येण्याचा त्रास होण्याची शक्यता असते.

डोळ्यांचं आरोग्य आणि जीवनसत्त्वे

आहारात जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचा समावेश गरजेचा असतो. मुख्यत्वेकरून डोळ्याच्या आरोग्यासाठी अ, , , आणि ड जीवनसत्त्वांची भूमिका महत्वाची असते. याच जीवनसत्वांविषयी....

अ :- मटण, चिकण, अंडी, दूध, गाजर, रताळी, मासे, केळी, खजूर, टोमॅटो, अंडयातील पिवळा भाग, यकृत, भाज्या, फळे, बिया, मांस, सोयाबीन

जीवनसत्त्वाच्या अभावामुळं रातांधळेपणा येण्याची शक्यता असते. उत्तरोत्तर दृष्टी मंदावत जाते. वारंवार रांजणवाडी येते. डोळ्यांच्या पापण्या सूजतात, डोळ्यांना तसेच पापण्यांच्या कडांना खाज सुटते.

ब :- तृणधान्य, मोड आलेली कडधान्यं, अंडी, दूध तसेच दुधाचे पदार्थ, पालेभाज्या, हिरव्या भाज्या, यकृत, सोयाबीन

शरीरात जीवनसत्त्वाचा अभाव निर्माण झाल्यास डोळ्यांची आग होते आणि डोळे लालसर होतात, दृष्टी दिवसेंदिवस कमी होते, तीव्र प्रकाश डोळ्यांना असह्य होतो.

क :- मोसंबी, संत्री, लिंबू, टोमॅटो, दूध, आवळे

जीवनसत्त्वाच्या अभावामुळे डोळ्यांच्या विविध भागांत रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. शरीरातील जीवनस्तवाची कमतरता वेळेत भरून न काढल्यास वृद्धापकाळी मोतीबिंदू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

:- दूध, लोणी, कॉडलिव्हर ऑईल, अंडी, त्वचेवर पडणारे कोवळे सुर्यकिरण.

जीवनसत्त्वांच्या अभावामुळं मोतीबिंदू होण्याची जास्त शक्यता असते.


डॉ. कीर्ती प्रवीण ढोबळे,

नवी मुंबई

शुक्रवार, २७ जानेवारी, २०१२

कानाचे आरोग्य आणि काळजी

‘कानाने बहिरा, मुका परि नाही’ कानाचे महत्त्व सांगण्यासाठी हा अभंग पुरेसा आहे. ऐकूनच माणसाला बोलता येतं या तत्वानुसार कानाने ऐकताच न येणाऱ्या व्यक्तींना मुकेपणा नसतानाही बोलणं शक्य होत नाही. कानाच्या निष्क्रियतेमुळे श्रवण आणि त्यामुळे इतरांशी संवाद अशक्य होतो. परिणामी व्यक्तीचा जगाशी संपर्क तुटल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. कान निष्क्रीय असतील तर चारी बाजूंनी वेढलेल्या पण एकाकी बेटासारखी व्यक्तीची अवस्था होते. म्हणूनच कानाची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. हल्लीच्या धकाधकीच्या आणि प्रदूषणाने वेढलेल्या परिस्थितीत कानासारख्या इंद्रियांची काळजी क्रमप्राप्त ठरते. घामाच्या धारा वहायला लावणाऱ्या उन्हाळ्यासह थंडी आणि पावसाळ्यातही कानांची खास काळजी घेणं गरजेचं असतं. कानाची काळजी घेण्याबाबतच्या उपायांची माहिती आपण आज करून घेणार आहोत. मात्र त्याआधी कानाच्या रचनेचा गोषवारा आपण घेऊ.

कानात अडकवलेली डुलं आपल्याला मनमोहक वाटतात मात्र बाहेरून दिसणारा कान आतमध्येही खूप गहन असतो. मुख्यत: बाह्यकर्ण, मध्यकर्ण आणि अंतर्कर्ण अशा तीन भागांत कानाचे वर्गीकरण केले जाते.
बाह्यकर्ण - बाह्यकर्णाची रचना बाहेर पसरट आणि आत नळीप्रमाणे अरुंद होत जाणारी असते. बाह्यकर्णाच्या
त्वचेतून तेलकट पदार्थ पाझरतो. त्यामुळे हा भाग कोमल, मऊ आणि नाजूक राहतो.
मध्यकर्ण - मध्यकर्ण म्हणजे हाडामधील एक छोटीशी पोकळी असते. जिच्या एका बाजूला कानाचा पडदा असतो आणि दुस-या बाजूला अंतर्कर्णाचा शंख असतो.
अंतर्कर्ण - अंतर्कर्ण म्हणजे हाडांच्या पोकळीतला नाजूक शंख. ध्वनिलहरींचा संदेश चेतातंतूंच्या माध्यमातून मेंदूपर्यंत पोहचवणे हे या शंखाचे मुख्य काम होय. अंतकर्णाचे दुसरे महत्त्वाचे शरीराचा तोल सांभाळणे.
अंतर्कर्णातील एका विशिष्ट भागात द्रवपदार्थ असतो. या द्रवपदार्थात शरीराचा तोल सांभाळण्यास मदत करणाऱ्या पेशी असतात. या पेशींची रचना आश्चर्यकारक असते. मात्र या पेशींमध्ये असंबंध हालचाली झाल्यास शरीराचा तोल जातो.
कानचे कार्य हे महत्त्वाचे असल्याने त्याची योग्य निगा आणि काळजी घेण गरजेचं असतं. आजार होण्याआधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि सजगता क्रमपाप्त ठरत असते. म्हणूनच आपण आज कानाची काळजी घेण्याबाबत जाणून घेणार आहोत.
सतत मोठ्या आवाजात काम करणं, फटाके, जास्त आवाजाच्या गाड्या चालवणे तसेच सतत फोन किंवा मोबाईलवर बोलत राहणे, वॉकमन, आयपॅड, मोबाईलचे इयरफोन कानाला लाऊन मोठ्या आवाजात गाणी ऐकणे, स्टेशनवर ट्रेनच्या कर्णकर्कश आवाज सतत कानावर पडणे आदी गोष्टींमुळे कानाची श्रवणक्षमता उत्तरोत्तर कमी
होत जाते. श्रवणक्षमता कमी होण्याचं पहिलं लक्षण म्हणजे व्यक्ती मोठ्यानं बोलू लागते. अशावेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन लगेचच उपचार करून घ्यावेत. सतत मोठ्या आवाजात काम करणाऱ्यांनी किमान सहा महिन्यांतून एकदा कानाची तपासणी करून घ्यावी. मोठ्या आवाजात काम करणाऱ्यांनी कानात कापसाचे बोळे घालणे उत्तम.

कानातला मळ काढण्यासाठी काही घरगुती उपायही उपयुक्त ठरतात. दोन ते तीन दिवस रात्री झोपताना कानात ग्लिसरीनचे दोन ते तीन थेंब टाकावेत किंवा दोन चमचे खोबरेल तेलात लसणाच्या दोन पाकळ्या टाकून लसून लाल होईपर्यंत गरम करून घ्यावं आणि हे मिश्रण थंड झाल्यावर कानात टाकावं. त्यामुळे कानातला मळ मऊ होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे कानात हायड्रोजन पेरॉक्साईडचे दोन थेंब टाकले तरी कानातला मळ मऊ होतो. मऊ झालेला मळ अलगद काढून घ्यावा. मात्र कित्येकदा कानातला मळ कडक होऊन तो निघेणासा होतो. अशावेळी जबरदस्तीने मळ काढण्यापेक्षा डॉक्टरांकडून काढणं फायदेशीर ठरतं. कानातला मळ कडक होऊन खडा होऊ नये म्हणून आपल्याकडे कानात रोज तेल घालण्याची पद्धत आहे. मात्र रोज तेल घालण्याच्या सवयीमुळे कानात बुरशी होऊन जंतूसंसर्ग होण्याचा धोका असतो. म्हणून पंधरा ते वीस दिवसांतूनन कानात तेल घालावं.कानात मळ साचणेही कानाच्या आरोग्याला अपायकारक असते. उन्हाळ्यात घामाचे पाणी कानात जाण्यामुळे, धुळीचे कण तसेच अंघोळ करताना साबण कानात जाण्यामुळे कानात मळ साचतो. त्यामुळे कानाची स्वच्छता ठेवणं गरजेचं असतं. तसेच कानातला मळ वरचेवर साफ करणंही आवश्यक असतं. मात्र कान साफ करताना कान कोरणे, काडेपेटीतील काडी वापरणं कानासाठी घातक ठरू शकतं. कान साफ करण्याच्या इशा साधनांमुळं कान बाहेर निघण्याऐवजी आतच ढकलला जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कानातील मळ आत सरकत थेट कानाच्या पडद्याला चिकटण्याची शक्यता नाकारता येत नाही. कानाचा पडदा अतिशय नाजूक असल्याने पडद्याला थोडा जरी स्पर्श झाला तर कान दुखतो. तसेच मळ काढण्यासाठी अशा वस्तूंच्या वापरामुळे कानात इजा होण्याचीही शक्यता असते.
म्हणून कानातला मळ काढण्यासाठी रात्री झोपताना कानात डॉक्टरांच्या सल्ल्याने ड्रॉप्स घालावेत त्यामुळे कानातला मळ बाहेर येण्यास मदत होते. सकाळी वर आलेला मळ चांगल्या प्रतीच्या बड्सने हलकेच बाहेर काढावा. रस्त्यांवर कानातला मळ काढणाऱ्यांकडून मळ अजिबात काढू नये. कधी कधी कानात मळ साचल्याने कान चावतो किंवा आतून खाज आल्यासारखं वाटतं. अशावेळी हाताची बोटं, पेन किंवा पेन्सिल कानात घालण्याची सवय अनेकांना असते. मात्र असं केल्यानं कानाला इजा पोहचून कानात रक्तस्त्राव होऊ शकतो.
पाण्यात पोहणाऱ्या व्यक्तींनी कानातलं पाणी काढणं गरजेचं असतं. कान व्यवस्थित साफ करून कान कोरडा ठेवणं गरजेचं असतं. कानात पाणी साचून राहिल्यानं कानात बुरशी होण्याची शक्यता असते. उन्हाळ्याच्या दिवसांत घामाच्या धारा कानात जाऊन मळ साचण्याची किंवा कानात बुरशी होण्याची शक्यता असते. त्यामुळे कान कोरडा राहील याची काळजी घ्यावी. पावसाळ्यातही कानात पाणी जाऊन कान ओला राहतो त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत कानाची विषेष काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीत कानाला मफलर किंवा उबदार कपडा बांधावा, कानात थंड हवा जाऊ न देण्याची काळजी घ्यावी. जोराचा वारा तसेच प्रवास करताना कानाला कपडा बांधावा. अशाप्रकारे कानांची काळजी घेतल्यास जगाला ऐकत राहण्यातला आनंद आपण आयुष्यभर घेऊ शकतो.

डॉ. कीर्ती प्रवीण ढोबळे

रविवार, १ जानेवारी, २०१२

नवरीचा मेकअप : त्वचा आणि केसांची काळजी

‘आली लग्न घटिका...समीप नवरा..’ अशा मंगलाष्टकांचे सूर कानावर पडू लागताच लग्नसराईची धामधूम सुरू झाली हे समजतं. ‘शुभमंगल सावधान’चा मंगलमयी सूर, विविध अत्तरं, फुलांचा स्वर्गीय सुगंध आणि रंगीबेरंगी अक्षतांचा पाऊस असं चित्र अख्ख्या लग्नसराईत ठिकठिकाणी दिसू लागतं. सनई, चौघडे वाजू लागतात, घर आंगण सजतं, वातावरण मांगल्यानं ओसंडून वाहतं, घरातल्या कच्च्या-बच्च्यांच्या उत्साहाला पारावार राहत नाही. अबालवृद्धांची उत्साही लगबग आणि करवल्यांची धांदल उडते, वरबाप-वरमाईची लगबग सुरू होते आणि इकडे नवरीच्या कपड्या-दागिन्यांच्या खरेदीची झुंबड उडते. हातापायांवर मेंदीच्या सुरावटी उमटू लागतात. नखांवर विविध रंगछटांच्या नखपॉलिशचे थर चढू लागतात. लग्नसोहळ्यात सर्वांच्या औत्सुक्याचा आणि आकर्षणाचा विषय असते नवरी...म्हणूनच नवरीच्या मेकअपकडे खास लक्ष दिलं जातं. नवरीच्या मैत्रिणी, नणंदा-भावजया नवरीच्या सजावटीसाठी लगबगीनं पुढाकार घेतात. नवरीच्या मेकअपसाठी नवरीचा दादा मेकअपचं साहित्य बाजारातून आवर्जून आणतो. मात्र मेकअपसाठी घरगुती आणि आयुर्वेदाचा आधार घेतल्यास रासायनिक सौंदर्यसाधनांचा त्वचेवर तसेच केसांवर संभाव्य अपाय टाळणं सोपं जातं. लग्नाआधीच काही दिवस त्वचा आणि केसाची काळजी घेणं गरजेचं असतं, म्हणूनच लग्नात नवरी खुलून दिसण्यासाठी लग्नाआधी काळजी कशी घ्यावी आणि लग्नादिवशी नवरीच्या मेकअपसाठी घरगुती आणि आयुर्वेदिक पद्धतींचा वापर कसा करावा हे आपण आज
पाहणार आहोत.

चेहऱ्याची काळजी- लग्नाआधी महिन्याभरापासून आपण चेहरा तजेलदार दिसण्यासाठी काही आयुर्वेदिक घरगुती उपाय करू शकतो. चेहऱ्यावर काळे डाग तसेच पिंपल्स असतील तर आधी कोमठ पाण्याने चेहरा धुवावा आणि नीट कोरडा करावा. त्यानंतर एक चमचा दही घेऊन त्यात १ चमचा मसूरचं पीठ टाकून त्याची पेस्ट करुन चेहऱ्यावर
लावावं आणि सुमारे अर्ध्या तासाने चेहरा थंड पाण्याने स्वच्छ क

रावा. चेहऱ्यावर पिंपल्स किंवा डोळ्यांखाली काळी वर्तुळे असतील तर कच्च्या पपईचा गर चेहऱ्याला लावावा. दोन कप थंड दुधात एक चमचा चंदन पावडर, एक चमचा मांजिष्ठ पावडर, एक चमचा कापूर कचरी पावडर आणि अर्धा चमचा आंबे हळद टाकून संपूर्ण चेहऱ्यावर लावावं आणि 15 ते 20 मिनिटांनी चेहरा धुऊन घ्यावा. यामुळे चेहरा चमकदार बनतो. चेहऱ्यावर पिंपल्सचं प्रमाण वाढलेलं असेल तर फेशियलसाठी कोरफडाचा गर लावावा. कोरफडाचा गर लावल्यानं चेहऱ्यावर उत्तम फेशियल होतं. गव्हामध्ये चेहरा तजेलदार बनण्यासाठी आवश्यक ते व्हिटॅमिन्स असतात त्यामुळे गव्हाचा कोंडा - दुधाची साय - दूध एकत्र करून त्याचा पातळ लेप
चेहऱ्यावर लावावा. चेहरा तेलकट असेल तर एक चमचा मधात एक चमचा काकडीचा रस आणि तेवढाच संत्र्याचा रस एकत्र करून तयार झालेली घरगुती क्रीम चेहऱ्याला लावावी. 15 ते 20 मिनिटं ठेऊन चेहरा पुन्हा स्वच्छ करावा. त्याचप्रमाणे जायफळ पाण्यात उगळून पिंपल्स तसेच डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांवर लावावे. कित्येकदा चेहऱ्यावरचे पिंपल्स गेल्यानंतरही त्यांचे डाग
चेहऱ्यावरचा

मुक्काम हलवत नाहीत. अशावेळी 15 दिवस दररोज टोमॅटोचा रस, काकडीचा रस, कोबीचा रस समप्रमाणात घेऊन चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्सचे डाग तातडीने नाहीसे होतात. पिंपल्सचे डाग नष्ट करण्यासाठी तुळशीच्या पानांचा रस-पुदिन्याचा रस-हळद एकत्र करून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावावी. चेहऱ्यावर टोमॅटोचा गर लावल्यानेही चेहऱ्याला चमक येते. चेहऱ्यावरील तसेच अंगावरील लव कमी करण्यासाठी पपिता पावड-नीमा पावडर-मंजिष्ठा समप्रमाणात घेऊन त्यात पाव चमचा आंबेहळद टाकावी आणि या मिश्रणात चार पट मसूर डाळीचे पातळ पीठ टाकून पाणी मिसळून त्याची पेस्ट लावावी. तसेच पिंपल्सचे प्रमाण कमी करण्यासाठी बाजरीच्या पीठाचा लेप चेहऱ्याला रात्री झोपण्यापूर्वी द्यावा. बाजरीच्या पीठाचा लेप 10 ते 15 मिनिटं ठेऊन कोमठ पाण्याने चेहरा धुवावा.
लग्नादिवशीचा मेकअप- महिनाभर केलेल्या घरगुती उपायांनी चेहऱ्याला एकप्रकारची लखाकी येते. मात्र लग्नादिवशी चेहऱ्यावर मेकअपचा तसेच रासायनिक सौंदर्यसाधनांचा अतिरेक झाल्यास चेहऱ्याच्या त्वचेवर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लग्नादिवशीचा मेकअप खूप काळजीपूर्वक करावा. लग्नाच्या आदल्या रात्री झोपताना चेहऱ्यावर 5 ते 10 मिनिटं बर्फ चोळावा नंतर चेहरा पुसून चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घ्यावी. त्यानंतर चेहरा कोमठ पाण्याने साबणाचा वापर न करता स्वच्छ धुवून घ्यावा आणि कोरडा करून घ्यावा. त्यानंतर बटाट्याची साल काढून त्याचे छोटे काप करून त्याची मिक्सर किंवा वरवंट्याच्या सहाय्याने पेस्ट करावी. या पेस्टचा लेप चेहऱ्यावर 10 मिनिटं लावावा.
यामुळे चेहरा चांगला ब्लिच हेतो. त्यानंतर संत्री, मोसंबी किंवा साधारण आंबट फळांच्या गरात पिकलेली पपई किंवा केळी घालून चेहऱ्याचा मसाज करून कोमठ दुधात कापूस बुडवून चेहरा धुवून घ्यावा. लग्नादिवशी सकाळी उठल्यावर मुलतानी माती पाण्यात टाकून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावावी आणि अर्ध्या तासानंतर
कोमठ पाण्यात थोडा रखरखीत स्पंज भिजवून चेहरा स्वच्छ करावा. अंघोळीपूर्वी चेहऱ्याला आणि हातापायांना खोबऱ्याचं तेल लावावं. लग्नादिवशी अंघोळीसाठी रासायनिक साबणाऐवजी दुधाचा वापर केलेला सौम्य साबण वापरावा. हल्ली लग्नात चेहऱ्याला फाऊंडेशन लावण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र फाऊंडेशनची निवड करताना आयुर्वेदिक फाऊंडेशनला प्राधान्य द्यावं. विवाह सोहळ्यात गर्दी आणि जास्त तीव्रतेच्या लाईट्सचा वापर केल्यामुळे घाम येऊन चेहऱ्यावरील फाऊंडेशनचं तेज कमी होतं. अशा वातावरणात फाऊंडेशनचं तेज जास्त काळ टिकण्यासाठी फाऊंडेशन लावण्यापूर्वी चेहऱ्याला बर्फ चोळल्यास फायदा होतो. फाऊंडेशन लावण्यासाठी हाताऐवजी स्पंजचा वापर करावा. तसेच त्वचेचा रंग सावळा असल्यास फाऊंडेशन कमी प्रमाणात लावावं, नाहीतर चेहरा पांढरट दिसू शकतो. ओठांना लिपस्टिक लावताना चेहऱ्याच्या रंगानुसार लिपस्टिकच्या रंगाची निवड करावी. लग्नात शक्यतो सौम्य रंगाचे लिपस्टिक वापरावे. कारण भडक रंगाच्या लिपस्टिकनं नवरीचं वय जास्त दिसण्याची शक्यता असते. साडी किंवा ड्रेसच्या रंगाला क्रॉस मॅचिंग होऊ नये याची काळजी घेऊनच लिपस्टिकचा रंग निवडावा. ओठांना लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना आमसूल तेल लावावं आणि ओठ धुवून मगच लिपस्टिक लावावं. लिपस्टिक निवडताना ते ब्रँडेड कंपनीचं असावं
याची काळजी घ्यावी. हाताच्या कोपरांचा तसेच बोटांच्या सांध्यांवरील त्वचेचा काळसर रंग जाण्यासाठी अर्धा चमचा लिंबाच्या रसात अर्धा चमचा मध आणि तेल टाकून हे मिश्रण कोपरांच्या तसेच बोटांच्या सांध्यांवरील काळसर रंगावर लावावं. लग्नात हळदीचा सोहळा असतो. हळदीचा सोहळा सूरु होण्याआधी चेहऱ्याला आणि अंगाला खोबऱ्याचं तेल लावावं म्हणजे नंतर हळद काढणं सोपं जातं. नाहीतर चेहरा पिवळसर दिसण्याची शक्यता असते.

केसांची काळजी- केस गळत असतील तर लग्नाआधीच त्यावर उपाययोजना करणं गरजेचं असतं. रोज रात्री जास्वंद तेलाने केसांची मसाज करावी. मध्यम आकाराचे सालीसकट डाळींब, जास्वंदाचं फूल, 10 ब्रम्हीची पाने 1 चमचा आवळ्याची पावडर, चार ते पाच मेंदीची पाने मिक्सरमधून बारीक करून तिळाच्या तेलात टाकावं आणि लोखंडाच्या कढईत मंद आचेवर उकळेपर्यंत उष्ण करून घ्यावं. ते कोमठ असतानाच बाटलीत भरून ठेवावं आणि हे मिश्रण रोज रात्री केसांना लावावं. त्यामुळे केस गळण्याचं प्रमाण कमी होतं. केस चमकदार दिसावेत आणि केसातला कोंडा कमी व्हावा म्हणून कोरफड जेलने केसांची मसाज करावी. केसांना साय किंवा लोणी लावावं आणि किमान अर्ध्या तासाने केस धुवून घेतल्यास केस चमकदार बनतात. केसांना साबण लावण्याऐवजी शिककाई पावडर किंवा रिट्याचा वापर करावा. केसांना रोज रात्री झोपताना तेल लावणं केसांच्या आरोग्याला फायदेशीर
असतं. केस धुताना साबणाऐवजी आयुर्वेदिक शॅम्पू वापरावा. अर्धा किलो मेंदी, 10 ते 12 शिककाई, आवळा चूर्ण, रिठा, बेहडा, त्रिफळा चूर्ण, माका, निमपावडर, नागरमोथा, लिंबाच्या रसाचे दोन ते तीन थेंब यांचे मिश्रण घेऊन 5 ते 6 तास कॉफी किंवा चहाच्या उकळलेल्या पाण्यात भिजवावे. व ते केसांना लावावं. जास्त चांगल्या परिणामांसाठी अशा मिश्रणात अंडे मिसळावे. त्यामुळे केसांचे चांगले पोषण होते. अंघोळीनंतर गरम पाण्यात टॉवेल भिजवून त्याचा शेक केसांना द्यावा. केसांना चमकदार बनवण्यासाठी सकाळी कोवळ्या उन्हात बसावं. आठवड्यातून किमान दोन वेळा कोमठ
तेलाने हेड मसाज करावा. लग्नात केसांना विविध प्रकारचे गजरे घालण्यासाठी किंवा ओढणी लावण्यासाठी पिन किंवा टाचण्यांचा वापर करतात त्यामुळे ते काढतानाही केस तुटू न देता काळजीपूर्वक काढणं गरजेचं असतं.

मेकअप कसा काढावा- लग्न सोहळ्यानंतर मेकअप काढतानाही खास काळजी घ्यावी लागते. मेकअप काढताना हातांऐवजी कापूस किंवा स्पंजचा वापर करावा. मेकअप काढण्यासाठी कोमठ पाण्याचाच वापर करावा. आधी ग्लिसरीन आणि खोबऱ्याचं तेल मिसळून चेहऱ्यावर लावावं नंतरच चेहऱ्यावरचा मेकअप कापूस किंवा स्पंजच्या साह्याने पुसून घ्यावा. चेहरा धुण्यासाठी साबणाऐवजी आयुर्वेदिक फेस वॉशचा वापर करावा. त्यानंतर दूध, साय, लोणी, तूप मिसळून चेहऱ्याला लावावं. 10 ते 15 मिनिटं ठेऊन चेहरा स्वच्छ करावा.

अशाप्रकारे लग्नाआधी आणि लग्नादिवशी चेहरा आणि केसांची काळजी घेतल्यास गोड गोजिरी आणि लाज लाजिरी नवरी आणखी खुलून दिसते. त्याचप्रमाणे लग्नानंतर नवरीच्या त्वचा-केसांना होणारे संभाव्य अपाय आपण टाळू शकतो....शुभमंगल होत असताना त्वचा आणि केसांबाबत सावधान म्हणण्याची वेळ टाळता येऊ शकते.

डॉ. कीर्ती प्रवीण ढोबळे, नवी मुंबई

शुक्रवार, २३ डिसेंबर, २०११

आजारांची वर्दी...त्रासदायक सर्दी

वातावरणातील सततच्या बदलांनी, सततच्या प्रवासाने तसेच अचानक आहार-विहारात घडलेल्या बदलांमुळे आपल्या आरोग्यावर पहिला हल्ला सर्दी करते. सर्दीचा त्रास सुरू झाला की आपोआपच डोकेदुखी तसेच कित्येकदा
खोकल्याचा त्रासही डोकं वर काढतो. मुळात सर्दी ही अनेक आजारांची जननी समजली जाते. त्याचप्रमाणे तापासारख्या अनेक आजारांची वर्दी म्हणजे पूर्वसूचनाही सर्दीच देते. सर्दीचा हा मुख्यत्वेकरून हिवाळ्यात उद्भवनारा आजार समजला जातो. थंडीत सकाळचा प्रवास, पावसात भिजणे, थंड पेय तसेच थंड पदार्थ जास्त खाणे या सवयी सर्दीला आमंत्रण ठरतात. मात्र हल्लीच्या धकाधकीच्या जीवनमानात आणि प्रदूषित वातावरणामुळे कोणत्याही ऋतूमध्ये सर्दीचा त्रास अनेकांची पाठ सोडत नाही.


आधी पातळ असलेली सर्दी उत्तरोत्तर घट्ट होत जाते. सर्दी पडशात बारीक ताप येण्याचीही शक्यता असते. नाक बंद होऊन लालसर होते, घसा खवखवतो तसेच घशात खाजल्यासारखे होते. सर्दी झाल्यावर वेळीच उपाययोजना न केल्यास थकवा जाणवतो आणि जास्त दिवस सर्दी तशीच राहिली तर अशक्तपणा वाढत जातो. नाकाच्या आतल्या भागाला सूज आल्यानं नाकातून कानाकडे पोहोचणाऱ्या कानाघ नलिकेचे तोंड बंद होण्याची शक्यता असते. कानाघ नलिकेचे तोंड ब्लॉक झाल्याने कानात विशिष्ट संवेदना होणेमुळात सर्दी-पडसे एका विशिष्ट जातीच्या विषाणूंमुळे होते. कधीकधी सर्दी संसर्गामुळेही होऊ शकते. सर्दी-पडशामध्ये नाकाच्या आतील त्वचेचा दाह होतो आणि कित्येकदा नाकाच्या आतील त्वचेला सूज येते. नाकातून पाणी वाहू लागते. सर्दी झाल्यावर पहिल्या दोन-तीन दिवसात नाकातले पाणी पांढरे तसेच पातळ स्वरुपाचे असते.
किंवा कानात गच्चपणा जाणवतो तसेच कानाचे दडेही बसतात.

संसर्गातून झालेली सर्दी दोन-तीन दिवसांत आपोआप बरी होते मात्र अशा सर्दीत थंड पदार्थ वर्ज्य करत खाण्यापिण्याच्या सवयीत प्राथमिक बदल करणे गरजेचं असतं. सर्दी झाल्यावर प्राथमिक उपाययोजना म्हणून भरपूर कोमठ पाणी प्यावं. तसेच दिवसातून दोन ते तीन वेळा गरम पाण्यात कोबी टाकून त्याची वाफ घ्यावी. गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात. त्याचप्रमाणे रात्री झोपताना कापूर ठेचून गरम पाण्यात टाकावा आणि त्याची वाफ घ्यावी. तसेच पूर्णपणे विश्रांती घ्यावी. थंड वातावरणापासून दूर राहावं. शक्यतो एसीत जाणं टाळावं. प्रवास करताना कान आणि शरीर झाकून घ्यावं. उबदार कपडे तसेच झोपताना उबदार रजई घ्यावी. घरातलं वातावरण उबदार ठेवावं. शिंकताना नाकापुढे रुमाल धरावा. म्हणजे इतरांना सर्दीची बाधा होणार नाही.

घट्ट झालेली सर्दी नाकपुड्यात साचून राहिल्याने नाक चोंदते आणि श्वसनाला त्रास होतो. नंतर डोकेदुखी सुरू होते. त्याचप्रमाणे घट्ट झालेली सर्दी जास्त काळ राहिल्यास छातीत कफ साचतो आणि खोकला डोकं वर काढतो. खोकला जास्त काळ राहिल्यास फुफुसाचे आजार बळावण्याचा धोका असतो. त्यामुळे खोकल्यावर त्वरीत इपचार
करणं क्रमप्राप्त ठरतं. कित्येकदा खोकल्याचं मूळ टीबीसारख्या आजारातही असतं. त्यामुळे खोकला जास्त काळ टिकल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घ्यावेत. धुम्रपान, तंबाखू, गुटखा तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थ पूर्णत: वर्ज्य करावेत. दही, तुप तसेच थंड पदार्थ खाणं टाळावं. आहार गरम असेल याची काळजी घ्यावी. विविध प्रकारचे सूप सर्दी आणि खोकल्यावर गूणकारी ठरतात. सर्दी आणि खोकल्यावर काही आयुर्वेदिक घरगुती उपायही करता येतात. मात्र घरगुती उपाय करूनही फरक पडला नाही तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावेत.

1) नियमित द्राक्षांचं सेवन केल्यानंही सर्दीवर काही प्रमाणात मात करता येते.
2) नेहमी सर्दी होत असणाऱ्या व्यक्तींनी क जीवनसत्व असणाऱ्या पदार्थांचं ( संत्री, टोमॅटो) सेवन वाढवावं.
3) एक चमचा मधात चिमूटभर पांढऱ्या मिरीचं चूर्ण टाकून नीट घोटून आठवडाभर दिवसातून चार ते पाचवेळा घ्यावं.
4) काळी मिरी पावडर आणि सुंठीचं मिश्रण मधातून दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावं.

5) सुंठ आणि काळी मिरी पावडर मधात मिसळून दिवसातून दोन ते तीन वेळा घेतल्यास खोकल्यापासून आराम मिळू शकतो
6) हिवाळ्यात दररोजच्या जेवणात लसणाच्या दोन ते तीन पाकळ्यांचा समावेश केल्यास खोकल्यापासून सुटका मिळू शकते
7) हा अगदी साधा आणि सोपा असा उपाय आहे.
8) मध आणि आवळा पावडर यांचे मिश्रण तसेच द्राक्षाचा रस आणि मध यांचे मिश्रणही फायदेशीर ठरते.
9) पाव चमचा मिरी पावडर, पाव चमचा सुंठ पावडर, एक चमचा मध हे सगळे दोन चमचे पाण्यात मिसळावे. खोकल्याची उबळ आल्यावर हे मिश्रण घेतल्यास लगेच आराम मिळतो.


डॉ. कीर्ती प्रवीण ढोबळे,
नवी मुंबई